व्यंकटेश वैष्णव , बीडमागील अडीच ते तीन महिन्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने नुकतीच जिल्ह्यात सुरूवात केली असली तरी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. सोमवारपर्यंत जिल्हयात सरासरीच्या तुलनेत ४८.०३ टक्के एवढ्या पावसाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आहे.जिल्हयात १३० टक्के खरीपाची पेरणी जुलै दरम्यान झालेली आहे. मधल्या दोन महिन्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने जिल्हयातील खरीप पिके मोठ्या प्रमाणात करपून गेले आहेत. जिल्हयात ४ लाख हेक्टरवर कापूस, दीड लाख हेक्टर सोयाबीन तर ९० हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी झालेली असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. मोजक्याच शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध होते. परंतु बहुतांश शेतकऱ्यांची पिके पावसाअभावी करपून गेली आहेत. आज ना उद्या पाऊस पडेल या भाबड्या आशेवर अवलंबून असलेल्या बळीराजाचे पिक पावसा अभावी जळून खाक झालेले आहे. ही जिल्हयातील वस्तू स्थिती आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रातील पन्नास टक्के पिकांना सुरू असलेल्या पावसाचा फारसा फरक पडेल असे चित्र जिल्हयात नाही. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. मागील चार दिवसात जिल्हयात पावसाने सुरूवात केली मात्र अडीच महिने पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पेरलेले धान्य उगवलेच नाही. अशी परिस्थिती जिल्हयात बहुतांश ठिकाणी निर्माण झाली असल्याचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितले.
पाऊस आला पण हंगाम गेला
By admin | Updated: August 25, 2014 23:55 IST