परभणी : ‘जो जमीन सरकारी है, वह जमीन हमारी है’ अशा घोषणा देत येथे आयोजित घर हक्क परिषदेचे उद्घाटन झाले. परिषदेनंतर बेघर नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जागेची मागणी केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.लालसेनेच्या वतीने येथील शंकरनगरजवळ घर हक्क परिषद १ मार्च रोजी आयोजित केली होती. परंतु, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ही परिषद शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पार पडली. या परिषदेचे उद्घाटन मानव, ऋषभ, मयुरी आणि विराट या बालकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना गणपत भिसे म्हणाले, सरकारच्या मालकीची हजारो एकर जमीन बनावट कागदपत्र तयार करुन हडपली आहे. सरकारी जमीन भूमाफियांच्या घशात घालण्यासाठी महसूलचे अधिकारी, कर्मचारी सहकार्य करतात. ही जमीन बेघर लोकांना मिळाली पाहिजे. भूमाफियांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, यासाठी लालसेना लढा लढणार असल्याचे भिसे यांनी सांगितले. कॉ.ज्ञानेश्वर मोरे यांनी प्रास्ताविक केले. कॉ.उत्तम गोरे, प्रकाश बनपट्टे, पांडुरंग पवार, संतोष गायकवाड, संतोष शेळके, अशोक उबाळे, राणी गवळी यांनी मार्गदर्शन केले. विक्की गोरे यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेनंतर उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)
घर हक्क परिषदेचे परभणीत उद्घाटन
By admin | Updated: March 1, 2016 23:53 IST