जालना : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात एकही जागा जिंकता आली नाही. दोन मतदारसंघात या पक्षाच्या उमेदवारांनी तुल्यबळ लढत दिली असली तरी अन्य तीन ठिकाणी उमेदवारांना अनामत रक्कम देखील वाचवता आली नाही. त्यामुळे भवितव्याबाबत पक्षाला आता चिंतनाची गरज निर्माण झाली आहे. खरेतर हा जिल्हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून परिचित होता. त्यानंतर १९९५ पासून शिवसेना-भाजपा युतीचा बालेकिल्ला म्हणून जिल्ह्याची ओळख झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही, अशी स्थिती आहे. जिल्हा परिषदेत चार सदस्य आहेत. जालना व परतूर नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे. याशिवाय कुठेही काँग्रेस कार्यकर्त्यांना स्थान नाही. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांना केवळ ८ हजार मतांनीच पराभव झाला होता. परंतु एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विलास औताडे यांना दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला. मोदी लाटेमुळे देशभरात, राज्यात काँग्रेसला जसा मतांची टक्केवारी कमी होण्याचा फटका बसला, तसा तो जालन्यातही बसला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसने किमान जालन्यात विजय मिळवून भोपळा फोडला होता. विधानसभेपूर्वी जिल्ह्यात काँग्रेसचे जालन्यातून कैलास गोरंट्याल तर सहयोगी म्हणून परतूरमधून सुरेश जेथलिया हे आमदार म्हणून कार्यरत होते. मात्र या निवडणुकीत पक्षाच्या या दोन्ही उमेदवारांना पराभव सहन करावा लागला. परतूरमध्ये पक्षातीलच नाराज मंडळींनी अप्रत्यक्षपणे इतरांना सहकार्य केल्यामुळे या नाराजीचा फटका जेथलिया यांना सहन करावा लागला.भोकरदनमध्ये एल.के. दळवी यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुरेश गवळी यांच्याविरोधात बंडखोरी केली. त्याचा परिणाम काँग्रेसच्या मत विभाजनात झाला. तर घनसावंगीमध्ये तालुकाध्यक्ष विष्णू कंटुले यांचे नाव जवळपास निश्चित झालेले असताना तेथे ऐनवेळी उमेदवारी डॉ. संजय लाखे पाटील यांना जाहीर झाली. बदनापूरमध्ये उमेदवार आयात करावा लागला. तेथे सुभाष मगरे यांना उमेदवारी देण्यात आली. भोकरदन, घनसावंगी आणि बदनापूर या तिन्ही ठिकाणी उमेदवारांना अनामत रक्कम वाचवता आली नाही. (प्रतिनिधी) ४या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचू नये, यासाठी आता आटोकाट प्रयत्नांची गरज आहे. तसा सूर आता कार्यकर्त्यांमधूनच उमटू लागला आहे. जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच आगामी काळात वेगवेगळ्या निवडणुकांना कशाप्रकारे सामोरे जायचे, याचे नियोजन आतापासूनच करणे आवश्यक असल्याचे पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांमधूनच बोलले जात आहे.
आता काँग्रेसजनास चिंतनाची गरज
By admin | Updated: October 29, 2014 00:43 IST