औरंगाबाद : सातारा परिसरातील नागरिकांसाठी नगर परिषदेच्या वतीने नऊ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, रोटेशननुसार किमान दहा दिवसांनंतरच पाणीपुरवठा केला जातो, असा दावा नगर परिषद करीत असली तरी अनेक वस्त्यांत दोन महिन्यांत एकदाही टँकर आले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. या परिसरात लहान टँकर सुरु करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. टँकरची संख्या चारऐवजी नऊ झाली असली तरी दोन महिन्यांत काही वसाहती पाण्यापासून वंचितच आहेत.नगर परिषदेने टँकरवर विविध वसाहतींची नावे, नंबर टाकले असले तरी पाणीच मिळाले नाही, टँकर भरण्यास उशीर झाला, असे उत्तर नागरिकांना ऐकावे लागते. नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास टँकर पाठविण्याची वेळ दोन दिवसांनंतर असून टँकर पाठवून देतो, असे फक्त सांगून नागरिकांची बोळवण केली जाते. नाइलाजास्तव नागरिकांना खाजगी टँकरचे किंवा जारचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. निवडणुकीचे वेध लागल्याने अनेक जण इच्छुक उमेदवार टँकरने पाणीपुरवठा करतील, असा आशावाद बाळगून होते. सर्वांना एकाच वेळी पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदेने जलकुंभ बांधून एमआयडीसीचा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी उत्तम चव्हाण, रामप्रसाद गिल्डा, सतीश महानोर, आकाश वायाळ आदींनी केली आहे.