औरंगाबाद : ‘मी पडद्यावर साकारलेली लोकमान्य टिळक यांची भूमिका म्हणजे त्यांच्या जीवित कार्याला वाहिलेली नम्र आदरांजली आहे. हा चित्रपट पाहून आजच्या उच्चशिक्षित नवतरुणांमध्ये निर्माण झालेले डोळस देशप्रेम मला माझ्या कामाचे सार्थक झाल्याची भावना देते,’ या शब्दात चतुरस्र अभिनेता व रंगकर्मी सुबोध भावे याने ‘लोकमान्य’ चित्रपटाच्या निमित्ताने आपले मनोगत रसिकांपुढे मांडले.‘लोकमत’च्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त कविसंमेलनात ‘लोकमान्य’ चित्रपटाचे युवा दिग्दर्शक ओम राऊत व सुबोध भावे यांनी आवर्जून उपस्थिती लावत हा चित्रपट पाहण्याचे रसिकांना आवाहन केले. कवी अरुण म्हात्रे यांनी दोघांना बोलते करत त्यांचा चित्रप्रवास उलगडला. लोकमतचा प्रवास व ध्येय उलगडणारी एक चित्रफीत दाखविण्यात आली. ‘लोकमान्य’ मधील काही क्षणचित्रेही चित्रफितीतून रसिकांनी पाहिली.वृत्तपत्राला ‘लोकमत’ हे नाव टिळकांनीच सुचवले असल्याने टिळकांशी लोकमतचा जुना ॠणानुबंध आहे. लोकमान्य टिळकांच्या भूमिकेची नस कशी सापडली या प्रश्नाचे उत्तर देताना भावे म्हणाले, ‘माझे व्यक्तिमत्त्व गोंडस, हळवे आणि विशेषत: डोळे रोमँटिक असल्याने अनेकांनी मी लोकमान्य साकारण्यासाठी मुळीच योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. मग मी भूमिकेचा रियाज म्हणून मुख्यत: लोकमान्य टिळकांची करारी नजर पाहत राहिलो. त्यांचे फोटो, पुतळे अशा सर्वांवर मी लक्ष केंद्रित केले. या नजरेत मला त्यांचा आत्मा गवसला.’ बालपणापासून केलेली नाटके महाविद्यालयातील एकांकिका यातून मी घडत गेलो. एका नाटकात केलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेने मला पहिल्यांदा आत्मविश्वास दिला. त्या अर्थाने औरंगजेब माझे प्रेरणास्थानच आहे, अशीही भावना त्याने मांडली. हा चित्रपट का बनवावासा वाटला याचे उत्तर देताना राऊत म्हणाले, ‘आजच्या पिढीला खोट्या लढाया करणारे सुपरमॅन, बॅटमॅन माहीत आहेत; पण स्वातंत्र्यासाठी अनेक अवघड लढाया यशस्वीपणे जिंकणारे टिळक आमच्यापर्यंत नीट पोहोचले नाहीत. ते कळावेत, त्यातून काही प्रेरणा मिळावी यासाठीचा हा प्रयत्न आहे. टिळकांनी तरुणांना सोबत घेऊन स्वराज्य मिळविले. आजच्या तरुणांनी त्याचे सुराज्य घडवावे.’ स्त्री भूमिका करणारे नाजूक बालगंधर्व व कणखर, बाणेदार टिळक या विरोधी भूमिका सुबोधने लीलया केल्या. कारण तो ‘अॅक्टर’ नसून ‘रिअॅक्टर’ आहे. व्यक्तिरेखेचा अंश स्वत:मध्ये भिनवत तो भूमिका जगतो, असेही राऊत म्हणाले. मुक्तसंवादाचा शेवट करताना सुबोधने सुधीर मोघे व अशोक नायगावकर यांच्या टिळकांवरील रचनांचे अभिवाचन केले.
माझी भूमिका ही लोकमान्यांना आदरांजली
By admin | Updated: January 9, 2015 00:53 IST