भूम : शेतकर्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा, या उद्देशाने शासनाने सुरू केलेल्या आधारभूत धान्य खरेदी केंद्राकडून तीन-तीन महिने मालाचे पैसे मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. सद्यस्थितीत हरभर्याचे १ कोटी १२ लाख तर तुरीचे १ कोटी सोळा लाख रूपये थकित आहेत. खरिपाची पेरणी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असून, त्यासाठी शासनाने त्वरित हे पैसे द्यावेत, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, शिवाजी खरेदी-विक्री संघ आणि फेडरेशनच्या वतीने २५ मार्च २०१४ रोजी येथे आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत हरभरा खरेदी सुरू करण्यात आली होती. याला शेतकर्यांकडून प्रतिसादही चांगला मिळाला. केंद्रावर जवळपास ३ हजार ६४४ क्विंटल हरभर्याची खरेदी करण्यात आली. परंतु, याचे पैसे मात्र अद्याप मिळाले नसल्याचे शेतकरी सांगतात. याबाबत अधिक माहिती घेतली असता हरभरा उत्पादक जवळपास २३० शेतकर्यांचे १ कोटी १२ लाख ९७ हजार ९५० रूपये थकल्याची माहिती समोर आली. याशिवाय तुरीची विक्री केलेल्या शेतकर्यांनाही १ कोटी १६ लाख रूपये गेल्या तीन महिन्यांपासून मिळालेले नाहीत. यामुळे अगोदरच गारपीट, अवकळी पाऊस, वादळ या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणार्या शेतकर्यांसमोर विकलेल्या मालाचेही पैसे मिळत नसल्याने ऐन पेरणीच्या तोंडावर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर) फेडरेशनकडे पाठपुरावा सुरू शेतकर्यांना तुरीचे मागील पैसे व केंद्र सुरू झाल्यापासून थकलेले हरभर्याचे पैसे देण्यासाठी फेडरेशनकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यांच्याकडून रक्कम उपलब्ध होताच ती तातडीने शेतकर्यांना वाटप केली जाील, असे शिवाजी खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक आर. जी. बागडे यांनी सांगितले. २२ मेनंतर आंदोलन उभारू सध्या खरिपाच्या पेरण्या तोंडावर आल्या असून, शेतकरी आर्थिक संकटात आहेत. हा विचार करून शेतकर्यांचे थकलेले हरभर्याचे पैसे त्वरित द्यावेत. २२ मेपर्यंत हे पैसे नाही दिल्यास तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तानाजी पाटील यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. वेअरहाऊस नसल्याने अडचणीत भर भूम येथे खरेदी केलेला हरभरा ठेवण्यासाठी वेअरहाऊस उपलब्ध नसल्यामुळे अडचणी येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या दररोज सातशे ते आठशे क्विंटल हरभर्याची मापे होत असून, खरेदी केलेला हरभरा मोहोळ येथील वेअरहाऊसकडे घेऊन जावा लागत आहे. परिणामी माल खरेदीसही विलंब होत आहे.
आधारभूत खरेदी केंद्राकडे शेतीमालाचे कोट्यवधी थकित
By admin | Updated: May 16, 2014 00:16 IST