औरंगाबाद : मोहटादेवी, बजाजनगर येथील मीनाताई ठाकरे मार्केटमधील साईराम भाजीपाला व फळे विक्रेत्यांना वाळूज औद्योगिक वसाहतीतील भूखंड क्रमांक २०/२ या सहान जागेवर कायमस्वरूपी जागा द्यावी, या मागणीसाठी सोमवारपासून औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात साईराम भाजीपाला व फळे विक्रेत्यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे की, मागील १५ वर्षांपासून याठिकाणी सुमारे ३५० विक्रेते व्यवसाय करीत आहेत. त्यांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांमार्फत दबाव टाकला जात आहे. त्यामुळे विक्रेत्यांना वाळूज औद्योगिक वसाहतीतील भूखंड क्रमांक २०/२ या सहान जागेवर कायमस्वरूपी जागा द्यावी, पोलिसांमार्फत गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत, भाजी विक्रेत्यांना संपूर्ण सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. उपोषणाला ज्ञानेश्वर गावडे, मनोज बिजोरे, गणेश जामकर, भगवान माडे, सविता नेव्हळ, शारदा शीलनकर, संगीता निकम, वर्षा मोकासरे आदींसह बहुसंख्य भाजी विक्रेते कुटुंबासह उपोषणाला बसले आहेत.
कॅप्शन :
औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसलेले बजाजनगरातील मीनाताई ठाकरे मार्केटमधील साईराम भाजीपाला व फळविक्रेते.