जालना : शासनाच्या आदेशानुसार आवश्यक पुरावा आढळल्यास गायरान जमिनी कास्तकरांच्या नावे करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. याबाबत गायरान जमिनीवर किती कास्तकरांचे अतिक्रमण होते, याची माहिती घेण्यात येत आहे. यासंदर्भात ८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे.महाराष्ट्र दिनी शिवसेना दलित आघाडीच्या वतीने कास्तकरांच्या ताब्यातील जमिनी त्यांच्या नावे करून त्यांना सातबारा द्या, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांनी याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिल्याचे पत्र शिवसेना दलित आघाडीचे प्रमुख अॅड. भास्कर मगरे यांच्याकडे दिले होते.याबाबत अॅड. मगरे म्हणाले, १ एप्रिल १९७८ ते १४ एप्रिल १९९० या काळात गायरान जमिनीवर किती कास्तकरांचे अतिक्रमण आहे, ती जमीन संबंधितांच्या नावे नियमानुकूल करण्यासाठी जो आवश्यक पुरावा लागेल तो आढळून आल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आल्याचे अॅड. मगरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पुरावे असल्यास गायरान जमीन कास्तरांच्या नावे
By admin | Updated: May 7, 2015 00:54 IST