औरंगाबाद : ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर, दलित दलितेतर या मानसिकतेने आपले इतिहासकार ग्रस्त आहेत. त्यामुळे मराठ्यांचा, पर्यायाने महाराष्ट्राचा इतिहास समग्र न होता जातिग्रस्त स्वरूपात समोर आला.’ असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले. पसायदान प्रतिष्ठानतर्फे आयोजित सोहळा सृजनाचा या कार्यक्रमात ‘शोध महाराष्ट्राचा’ या विषयावर ते शनिवारी बोलत होते. लोकशाहीर संभाजी भगत, कवी प्रशांत मोरे, उद्योजक मानसिंग पवार, शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण उपस्थित होते. डॉ. मोरे यांचा संमेलनाध्यक्ष झाल्याबद्दल मानपत्र, वारकरी फेटा व शाल देऊन गौरव करण्यात आला. लक्ष्मीकांत धोंड यांनी मानपत्राचे वाचन केले. रूपेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. मोरे म्हणाले की, महाराष्ट्राचा शोध म्हणजे स्वत:चाच शोध आहे. बंगालमधील प्रख्यात इतिहासलेखक सर जदुनाथ सरकार यांनी छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांबाबत १९१९ साली लिहिलेल्या ‘शिवाजी अँड हिज टाइम्स’ या ग्रंथात त्यांच्याविषयी कमालीचे गौरवपूर्ण उद्गार काढले होते. ते असे की, आजतरी (म्हणजे तेव्हा) हिंदुस्थानात मराठ्यांशी कर्तृत्वात बरोबरी करील, असा एकही प्रांत नाही व अजून काही गुणविशेष त्यांनी आत्मसात केले, तर येत्या शंभर वर्षांत मराठे जगात अग्रेसर होतील.’ पण आज हे भाकीत खोटे ठरले आहे, असेच म्हणावे लागते, असे का घडले याचा सखोल विचार केल्यावर जाणवते की, आपली मनोवृत्ती आज ‘अतिपरिचयात अवज्ञा’ अशी झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला, जयंती साजरी केली की, आपले कर्तव्य संपले असे आपल्याला वाटते आणि दुसरे असे की, आपण जातीनिहाय इतिहास लिहिला. इंग्रजांनी मराठ्यांचा तेजस्वी इतिहास बेदखल केला. मात्र, आपणही ते बराच काळ मान्य केला. पुढे ही बाब आपल्या ध्यानात आल्यावर आपण आपला इतिहास लिहिला.ब्राह्मणांनी ब्राह्मणांना अनुकूल इतिहास लिहिला. त्याला प्रतिक्रिया म्हणून कायस्थप्रभूंनी, मराठा, ओबीसी, दलितांनीही इतिहास लिहिला, असा इतिहास केवळ प्रतिक्रियावादी झाला. हे टाळत तटस्थपणे इतिहासाचा अभ्यास व संशोधन मी केले. मराठी भाषेबाबत बोलताना मोरे म्हणाले, ‘राजकीय सत्तेची जोड नसेल तर भाषेला कधीच सन्मान मिळत नाही. हे जाणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कारभाराची, न्यायनिवाड्याची भाषा पूर्णत: मराठी केली. आज मराठी जगावी असे वाटत असेल तर कर्माची, म्हणजेच संवादाची भाषा मराठी झाली पाहिजे. ती बहुतेकदा इंग्रजी असते आणि शेवटी मराठीच्या अधोगतीचे खापर शासनावर फोडत आपण मोकळे होतो.’