औरंगाबाद : शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासह विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिलेला खंबीर पाठिंबा व शिक्षण मंडळाने २०११ मध्ये सोडलेल्या कॉपीमुक्त परीक्षेच्या संकल्पास या वर्षी चांगली फळे लागली. महसूल व पोलीस विभागाच्या मदतीने प्रभावीपणे राबविलेल्या या अभियानामुळे पहिल्या वर्षी तब्बल ५८.५० टक्क्यांपर्यंत घसरलेला निकाल यंदा ८७.०६ टक्क्यांवर आला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ६३.२३ टक्के विद्यार्थी विशेष प्रावीण्य आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. बीड जिल्ह्याने गुणात्मकता सुधारण्यात घेतलेली झेप मोठी आहे. यंदा बारावीपाठोपाठ दहावीतही बीड जिल्ह्याने विभागात प्रथम क्रमांक पटकावला. बीड जिल्ह्यातील ९,९९६ विद्यार्थी (३३ टक्के) विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाले. औरंगाबाद जिल्ह्यातील ११,७२५ विद्यार्थी (३९ टक्के), जालना जिल्ह्यातील १३ टक्के, परभणी जिल्ह्यातील १० टक्के आणि हिंगोली जिल्ह्यातील ५ टक्के विद्यार्थी विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाले. विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये औरंगाबाद जिल्हा आघाडीवर आहे. विभागात ३० हजार २७९ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. हे प्रमाण २३.६३ टक्के असून, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या ५० हजार ७४५ विद्यार्थ्यांची टक्केवारी ३९.६० एवढी लक्षणीय आहे. त्याचे कारणच शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीमध्ये दिसते, असे मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी सांगितले. चार वर्षांपूर्वीपर्यंत दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रांभोवती पालक व नागरिकांचा नेहमी घोळका असायचा. वर्गात विद्यार्थी व बाहेर त्यांचे नातेवाईक, मित्र कॉप्या पुरविण्यासाठी जमा झालेले असत. त्यावर तोडगा काढण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाचा जन्म झाला. हे अभियान शालेय शिक्षणमंत्र्यांनी उचलून धरले. अभियानात महसूल, पोलीस व अन्य शासकीय विभागांना सामील करून त्याची व्याप्ती वाढविण्यात आली. त्यामुळे सुरुवातीला निकाल घटला; परंतु नंतर मात्र विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत गेला व निकालातही तशी वाढ होत गेली. संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबद्ध व सर्वसमावेशक ‘गैरमार्गाशी लढा’ हे कृती अभियान मंडळाने राबविले. त्याचा परिणाम कॉप्याचे प्रकार रोखण्यात झाला. यंदा दहावीच्या परीक्षेत गैरमार्गाचा वापर करताना ३८ विद्यार्थी आढळले. त्यांची चौकशी सुरू आहे, असेही डेरे यांनी सांगितले. वर्ष व निकालाची वाढलेली टक्केवारीवर्ष उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारीमार्च-२०१० १ लाख ७ हजार ७९६ ७४.९६मार्च-२०११ ८४ हजार ८०८ ५८.५०मार्च-२०१२ ९९ हजार ९०१ ७१.३६मार्च-२०१३ १ लाख १५ हजार ८१.१८मार्च-२०१४ १ लाख २८ हजार ११३ ८७.०६
गुणवत्तेत मोठी वाढ
By admin | Updated: June 18, 2014 01:36 IST