अंबाजोगाई: शेतीमालास योग्य भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची आर्थिक सुधारणा होईल. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार पाशा पटेल यांनी केली.मानवलोकतर्फे अंबाजोगाईसह केज तालुक्यातील गारपीटग्रस्त अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकऱ्यांना खते व बियाणांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी पटेल बोलत होते. अध्यक्षस्थानी अरविंदराव गोरे होते. डॉ. द्वारकादास लोहिया, कार्यवाह अनिकेत लोहिया, सहकार्यवाह आगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.मागील दोन महिन्यापूर्वी आलेली पिके गारपिटीमुळे जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. या शेतकऱ्यांना प्रशासनाकडून योग्य मदत देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार नाही, असेही पटेल यांनी सांगितले. तर गोरे म्हणाले, प्रतिकूल परिस्थिती असली तरी काम करण्याची इच्छाशक्ती लागते. डॉ. लोहिया म्हणाले, शेतकऱ्यांसाठी याच अनुदानातून विविध ओढ्यांत खड्डे घेऊन जमिनीतील पाणीपातळी वाढविणे व शंभर गरीब शेतकऱ्यांच्या शेतात गाळ टाकण्याचे काम आपण करणार आहोत, असे सांगितले. किरण दामोशन व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकरी गीत सादर केले. संचालन प्रा. रमा पांडे यांनी तर उपस्थितांचे आभार चिंतामण कुलकर्णी यांनी मानले. यावेळी शेतकऱ्यांसह प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
‘शेतमालाला योग्य भाव मिळावा’
By admin | Updated: June 18, 2014 01:39 IST