औरंगाबाद : ओव्हर कमी आहेत व त्यात जास्त रण काढण्याचे माझे उद्दिष्ट आहे, असे उद्गार राज्याचे नवनियुक्त दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार यांनी लोकमतशी बोलताना काढले. राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर अब्दुल सत्तार पहिल्यांदाच शहरात आले होते. यावेळी विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. लोकमतशी बोलताना ते म्हणाले की, शेतीला पशुपालनाचा जोडधंदा देऊन दुधाचे उत्पादन वाढविण्यावर माझा विशेष जोर राहील. त्यासाठी सर्व प्रथम शेतकऱ्यांच्या गोठ्यात गाई, म्हशी पोहोचल्या पाहिजेत. ही योजना प्रभावीपणे राबविली जाईल. शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा करून दिला जाईल. राज्यातील आरे या शासकीय दूध योजनेचे बळकटीकरण करण्याचाही माझा प्रयत्न असेन. औरंगाबादसह राज्यात बंद पडलेली शासकीय दूध संकलन केंद्रे सुरू करण्यासाठी पावले उचलली जातील. त्यासाठी अगोदर दूध उत्पादन वाढले, तरच दूध संकलन वाढेल, म्हणून शेतकऱ्यांना गायी, म्हशी देण्यासह त्यांना संकरित चाराही उपलब्ध करून द्यावा लागेल. आगामी काळासाठी दुग्ध व पशुसंवर्धन विभागासाठी राज्याने २०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. याशिवाय केंद्र सरकारच्याही खूप योजना आहेत. त्या योजना येथे राबवून शेतकऱ्यांना अधिकाधिक बळकट केले जाईल. अब्दुल सत्तार यांच्या स्वागतासाठी विमानतळावर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली. ढोल, ताशे वाजवीत, फटाक्यांची आतषबाजी करीत हारतुऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. स्वागतासाठी आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हार, पुष्पगुच्छ स्वीकारत असताना सत्तार यांना विमानतळावरच एक तास लागला. यावेळी काँग्र्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, आ. डॉ. कल्याण काळे, नितीन पाटील, विनोद तांबे, जी.एस.ए. अन्सारी, पवन डोंगरे, डॉ. जितेंद्र देहाडे, संजय जगताप, किशोर तुलसीबागवाले, नामदेव पवार, राजकुमार जाधव, मनसुख झांबड, सिकंदर शेख, भारतकुमार राजपूत, फिरोज पटेल, करीम पटेल, रावसाहेब नाडे आदी जिल्हाभरातून कार्यकर्ते आले होते.
कमी ओव्हरमध्ये जास्त धावा काढायच्यात
By admin | Updated: June 9, 2014 01:04 IST