परभणी : तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी आता धूळ पेरणीला सुरुवात केली आहे. आजपर्यंत या तालुक्यात एकही मोठा पाऊस झाला नाही.पावसाळा सुरु होऊन सव्वा महिना उलटला. शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी-बियाणे व खते खरेदी केले. परंतु, आजपर्यंत पेरणी करण्यासारखा पाऊस झाला नाही.सध्या तालुक्यात ढगाळ वातावरण राहत आहे. या अभाळाकडे पाहूनच शेतकऱ्यांनी धूळ पेरणीला सुरुवात केली आहे. आज, उद्या वरुण राजाची कृपा होईल आणि पाऊस पडेल, या आशेवर असलेला शेतकरी महागामोलाचे बियाणे पेरणीसाठी वापरत आहेत. या भागात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचा मोबदला शासनाकडून मिळेल, अशी शेतकऱ्यांची मागणी होते. परंतु, ती देखील फोल ठरली. तसेच पावसानेही पाठ फिरविली. त्यामुळे संकटात सापडलेल्या या शेतकऱ्याने धूळपेरणीचा धोका पत्कारला आहे. गेल्या चार- पाच वर्षापासून तालुक्यातील शेतकरी कुठल्या न कुठल्या नैसर्गिक आपत्तीत सापडत आहेत. यावर्षी शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती असून पावसाकडे नजरा लागल्या आहेत. (प्रतिनिधी)
गंगाखेड तालुक्यात धूळ पेरणीला वेग
By admin | Updated: July 16, 2014 00:20 IST