औरंगाबाद : ‘आमच्या परिसरात हॉटेल चालवायची असेल तर दरमहा आम्हाला पाच हजार रुपये हप्ता, तसेच फुकट दारू द्यावी लागेल, नाही तर कशी हॉटेल चालविता पाहतो,’ अशी धमकी देणाऱ्या दोघांविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, उस्मानपुरा परिसरातील चौसर भागात लक्ष्मी पॅलेस नावाचा बीअरबार आहे. काल दुपारी आरोपी गणेश मगर आणि उत्तम भाले (रा. फुलेनगर, उस्मानपुरा) हे बारवर आले. ‘तुम्हाला आमच्या परिसरात हॉटेल चालवायची असेल, तर आम्हाला दरमहा पाच हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल. तसेच दररोज फुकट दारू पाजावी लागेल, अन्यथा हॉटेल चालू देणार नाही,’ असा आरोपींनी दम भरला. त्यावर हॉटेलचालक गुणवंत गुडले यांनी पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि आरोपी निघून गेले. त्यानंतर गुडले यांनी उस्मानपुरा पोलीस ठाणे गाठले आणि आरोपींविरुद्ध खंडणी वसुुलीची फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला.
हॉटेल चालकाला मागितली दरमहा पाच हजारांची खंडणी
By admin | Updated: December 16, 2014 01:07 IST