औरंगाबाद : महापालिकेची एप्रिल २०१५ मध्ये होणारी निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार आहे. मनपाने केलेल्या ‘नकाशां’चा अहवाल सादर करून एक महिना झाला आहे. नकाशांमध्ये अनेक त्रुटी निघाल्यामुळे आयोगाच्या दोन सदस्यांनी शनिवारी संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीसाठी फोन केला होता. दोन दिवसांत त्रुटी पूर्ण करून अहवाल देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मनपाच्या निवडणुका प्रभागनिहाय होणार की वॉर्डनिहाय हा मुद्दा अजून गुलदस्त्यातच आहे, तोवरच प्रभागांच्या नकाशांमध्ये त्रुटी निघाल्या आहेत. शिवसेना, भाजपा प्रभागरचनेच्या विरोधात आहे. या दोन्ही पक्षांच्या मतांनुसार रचनेत अनेक प्रभागांच्या हद्दींमध्ये क्लिष्ट पद्धतीने सीमा जोडण्यात आल्या आहेत. हद्द, लोकसंख्या, ब्लॉकनिहाय लोकसंख्येमध्ये त्रुटी गेल्या आठवड्यात आढळून आल्या आहेत. प्रभागांच्या दिशादर्शक खुणांमध्ये बदल होण्याचा संशय निवडणूक आयोगाला आला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ११ लाख ७५ हजार ११६ इतकी आहे. १८ ते २२ हजार लोकसंख्या एका प्रभागासाठी निश्चित करण्यात आली आहे. ११३ प्रभाग होण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला. २२ आॅक्टोबरलाच दिले नकाशे पालिकेच्या २० जणांची टीम विद्यमान नकाशांची हद्द कायम करण्यासाठी फेबु्रवारी २०१४ पासून परिश्रम घेत आहे. २२ आॅक्टोबर रोजी नकाशांचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला. त्या नकाशांमध्ये त्रुटी निघाल्या असून, त्या दुरुस्त करण्यासाठी मनपाला आजवर १० वेळा आयोगाने संपर्क केला आहे.
प्रभागांच्या नकाशात त्रुटी
By admin | Updated: December 1, 2014 01:27 IST