टाऊन हॉल येथील उड्डाणपुलाखाली अतिक्रमणांचा विळखा पडला होता. महापालिकेच्या पथकाने सकाळी सहा हातगाड्या व टपऱ्यांवर कारवाई केली. महावीर उड्डाणपुलाखाली दोन हातगाड्या जप्त केल्या. रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखालील १० अतिक्रमणे हटविण्यात आला. या ठिकाणी मातीचे ओटे बांधून भाजीपाला विक्रीची दुकाने थाटली होती. तसेच टपऱ्यांमध्ये दुकाने सुरू होते. ही दुकाने हटविण्यात आली. काही ठिकाणी कारवाईला विरोध करण्यात आला. बसस्थानकातील मातीचे ढिगारे हटविण्यात आले. तसेच बारापुल्ला गेट परिसरातील १२ अतिक्रमणे काढण्यात आली. त्यात पत्र्याचे चार शेड, तीन टपऱ्या, चार भंगार गाड्यासह किरकोळ अतिक्रमणांचा समावेश आहे. संग्रामनगर उड्डाणपुलाखालील हातगाडी जप्त करण्यात आली. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम याच्या मार्गदर्शनाखाली पदनिदेर्शित अधिकारी सविता सोनवणे, वसंत भोये, आर. एस. राचतवार, इमारत निरीक्षक पी. बी. गवळी, सय्यद जमशीद, मझहर अली, सुरासे, यांच्यासह पोलिसांच्या पथकाने केली.
मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी ऐतिहासिक दरवाजा शेजारील अतिक्रमणे २४ तासांत हटविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार बारापुल्ला गेट परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. महापालिकेच्या मालकीच्या जागेवरील आणि मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यावर सध्या भर देण्यात येत आहे.