विजय सरवदे, औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘अध्यासने उदंड जहाली’, असे म्हणायची वेळ आली आहे. राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या रेट्यामुळे विद्यापीठात अनेक महापुरुष व राजकीय नेत्यांच्या नावे अध्यासने सुरू झाली काही तत्त्वत: मान्य झाली, तर काही प्रस्तावित आहेत. या अध्यासनांसाठी विद्यापीठाने अलीकडच्या काळात सात ते आठ पटीने अनुदानाची तरतूदही केली; पण संचालकांनी स्वत:चे मानधन उचलण्यापलीकडे अध्यासनांच्या माध्यमातून भरीव असे उपक्रम राबविल्याचे दिसत नाही. प्रामुख्याने जगभरात संबंधित महापुरुषांच्या नावे किंवा राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या संशोधनाला चालना देणे, प्रासंगिक कार्यक्रम आयोजित करणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्रे, परिसंवाद आयोजित करणे, पदवी-पदविका अभ्यासक्रम राबविणे, पुणे-मुंबई विद्यापीठातील अध्यासनांच्या धर्तीवर काही साहित्य प्रकाशित करणे आदी उपक्रम राबविणे, या उद्देशाने विद्यापीठात अध्यासने सुरू करण्यात आली. मात्र, बहुतांशी अध्यासने केवळ महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी साजरी करण्यापुरतीच मर्यादित झाली आहेत. अर्थात, काही अध्यासने याला अपवाद आहेत. उल्लेखनीय काम करणाऱ्या मौलाना आझाद, गौतम बुद्ध आणि ताराबाई शिंदे या तीन अध्यासनांना विद्यापीठ अनुदान आयोगाचे अनुदानदेखील मिळते. विशेष म्हणजे, ताराबाई शिंदे अध्यासन केंद्राला बाराव्या पंचवार्षिक योजनेतून पदांनाही मंजुरी मिळाली आहे. या अध्यासन केंद्रामार्फत ‘वूमेन्स स्टडी’ हा पदवी व पदविका अभ्यासक्रम राबविला जातो. याचप्रमाणे मौलाना आझाद अध्यासन केंद्रामार्फत ‘आंतरराष्ट्रीय शांतता व सौहार्द’ हा पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येतो. अन्य अध्यासन केंद्रांमध्ये मात्र पदवी-पदविका अभ्यासक्रम, संशोधनाबाबत उदासीनताच दिसून येते. अध्यासन केंद्रामार्फत संशोधन छात्रवृत्ती देण्यासाठी तरतूद आहे; पण ६ ते ७ अध्यासन केंद्रांनी एकाही संशोधक विद्यार्थ्याला ही छात्रवृत्ती दिलेली नाही.सन २०१४-१५ पर्यंत अध्यासनांसाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पामध्ये प्रतिवर्ष दीड लाख रुपये एवढी तरतूद केली जात होती. मागील सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून मात्र, तब्बल सव्वाआठ लाख रुपये एवढी वाढीव तरतूद करण्यात आली आहे. यंदाही तेवढीच तरतूद आहे. यामध्ये संबंधित संचालकांचे मानधन (हजार ते दोन हजार रुपये प्रतिमहिना), मुद्रण आणि लेखन सामुग्री, आकस्मिक खर्च, चर्चासत्रे, परिषदा, कार्यशाळा, शिबिरे व स्पर्धांचे आयोजन, संशोधन प्रकल्प, हस्तलिखिते, दस्तावेज आणि संशोधन यासाठी तरतूद करण्यात येते. तरतूद आहे; पण खर्च नाही, अशी अवस्था विद्यापीठातील अध्यासन केंद्रांची झाली आहे.
संचालकांची उदासीनता
By admin | Updated: April 24, 2016 00:11 IST