जालना: रक्त पिशव्यांची दिवसेंदिवस मोठी गरज भासत असताना तुलनेने या जिल्ह्यात रक्तदाते समोर येत नसल्याचे गंभीर चित्र अद्यापही कायम आहे.शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीसह जनकल्याण रक्तपेढी जिल्ह्यात कार्यरत आहे. ना नफा ना तोटा या तत्वाने, सेवाभावी वृत्तीने या दोन्ही रक्तपेढ्या रुग्णांना सेवा देत आहेत. या व्यतिरिक्त संघर्ष ब्लड ग्रुप, डोणर, गणेश चौधरी ब्लड ग्रुप या सारखे ग्रुपसुद्धा रुग्णांना मानेइतबारे भक्कम सहकार्य करीत आहेत. परंतु या जिल्ह्यात या जिल्ह्यात दिवसेंदिवस रक्त पिशव्यांची मोठी गरज भासत आहे. त्या तुलनेत मोठ्या संख्येने रक्तदाते समोर येत नाहीत, असे चित्र कायम आहे. सर्वसाधारणपणे दिवसाला चाळीस तर वर्षाला तब्बल बारा हजार रक्त पिशव्यांची गरज भासत आहे. यासाठी सहा हजार रक्तदात्यांनी समोर येण्याची गरज आहे. परंतु तुलनेने रक्तदाते मोठ्या संख्येने समोर येत नाहीत, असे जाणकारांचे मत आहे. शासकीय व जनकल्याण या दोन रक्तपेढ्यांद्वारे दरवर्षी रक्तसंकलनाची मोहीम राबविली जाते. ग्रुपसह सामाजिक संस्थासुद्धा त्यासाठी पुढाकार घेतात. मात्र, मागणी व संकलनाच्या व्यस्तप्रमाणाच्या पार्श्वभूमीवरच रक्त संकलनाकरता मोठ्या प्रमाणावर मोहीमा राबविणे नितांत गरजेचे ठरले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीत सर्वसाधारणपणे महिन्याकाठी दीडशे बॅग रक्तसंकलित होते. परंतु सरासरी महिन्याकाठी २५० बॅगांची मागणी आहे. रक्तपेढीतील अधिकारी व कर्मचारी धावपळ करीत ताळमेळ बसविण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र उन्हाळ्यात रक्त संकलनात मोठा त्रास होतो हे वास्तव आहे. शहरी व ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या महिन्यांत मागणीप्रमाणे रक्त संकलन होत नाही. विशेषत: ग्रामीण भागात रक्तदानाविषयीच मोठ्या प्रमाणावर समजगैरसमज आजही कायम आहेत. परिणामी बाराही महिने ग्रामीण भागातून म्हणावा एवढा रक्तसंकलनासाठी प्रतिसाद मिळत नाही. असे सर्वसाधारण चित्र आहे. रक्तदानाने अशक्तपणा येतो, रक्त तयार होत नाही, शारीरिक दुष्परिणाम होतात वगैरे गैर समज कायम आहेत. वास्तविकता रक्तदानाचे फायदे खूप आहेत. रक्तदानाने नव्याने पेशी तयार होतात. रोग प्रतिकार शक्ती वाढते, वर्षभरात दोनदा रक्तदान केल्यास रोग सुद्धा होत नाही असे वैद्यकीय क्षेत्राने स्पष्ट केले आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात रक्तदानाविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)गतवर्षी ८९० बॅग रक्त संचलित शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीने गेल्यावर्षी ८९० बॅग रक्त संकलित केले होते. यावर्षी या रक्तपेढीने अवघ्या सहा महिन्यांतच ८२४ बॅग रक्त संकलित केले आहे, अशी माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी अरुण धोत्रे यांनी लोकमतशी बोलताना दिली. उन्हाळ्यात रक्तसंकलनासाठी मोठा त्रास होतो. परंतु ताळमेळ बसविण्याचा रक्तपेढीद्वारे प्रयत्न होतो. असे नमूद करीत एबी निगेटिव्ह रक्त नियमित उपलब्ध होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.रक्तदाना संदर्भात मोठ्या प्रमाणात जाणिव निर्माण होण्याची गरज असल्याचे मत गणेश चौधरी ब्लड डोणर ग्रुपचे अध्यक्ष गणेश चौधरी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. आपत्कालीन स्थितीत रक्तासाठी कुटुंबिय वाटेल तेवढे पैसे मोजावयास तयार असतात. परंतु बदली रक्तासाठी त्या कुटुंबियांची मानसिकता नसते, अशी खंत व्यक्त केली. आजही रक्ताचा मोठा तुटवडा आहे. ग्रामीण भागातील रुग्णांनाच जास्त रक्ताची गरज आहे. शुक्रवारी १७ जणांना रक्तासाठी औरंगाबाद गाठावे लागल्याची माहिती चौधरी यांनी दिली.रक्तदान हे अनमोल जीवदान आहे. आपले रक्त एखाद्याला गरजवंताला, रुग्णाला, आपघात ग्रस्ताला जीवदान ठरु शकते. कोणाला कधी, कोठे रक्ताची गरज भासेल हे सांगता येत नाही. म्हणूनच ‘दान रक्ताचे,ऋूण फेडू या समाजाचे’ हा नारा अंगिकारला पाहिजे असे मत दरेगाव येथील संघर्ष ब्लड ग्रुप डोनरचे अध्यक्ष सतीश वाहुळे यांनी व्यक्त केले.
रक्तदानाविषयी उदासीनताच
By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST