जालना : भोकरदन तालुक्यात डेंग्यूसदृश तापाच्या साथीने चार गावांना घेरले असून दिवसेंदिवस गावांची संख्या तर वाढतेच आहे, मात्र तापामुळे बळींची संख्याही ३ वर पोहोचली आहे. साथरोगाच्या परिस्थितीत आरोग्य विभागाने फारशी दक्षता न बाळगल्याने ऐन सणासुदीच्या काळात ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. पद्मावती, जळगाव सपकाळ, कोदोली आणि लेहा या चार गावांमध्ये या तापाची साथ सुरू असून रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याने रुग्णांना उपचारासाठी त्यांचे नातेवाईक बुलढाणा किंवा औरंगाबाद येथे नेत आहेत. अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र या गंभीर प्रकाराची पाहिजे तशी दखल न घेतल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पद्मावती येथे बालवयीन भाऊ-बहिणीचा तर जळगाव सपकाळ येथे एका तरूणाचा तापाने मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागाने या गावांना भेटी दिल्या. मात्र तातडीने उपाययोजना झालेली नाही, असा ग्रामस्थांचा सूर आहे. मात्र आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचा दावा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे. साथरोग असलेल्या गावांमध्ये आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण केले असून घरोघर पाण्यातील डासअळींचा शोध घेतला आहे. तर काही गावांमध्ये रुग्णांची संख्या एक-दोन अशीच असल्याचा दावाही या पथकातील सदस्यांनी केला आहे. लेहा येथे साथरोगाने थैमान घातलेले असताना या गावासाठी असलेल्या धावडा आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेवक सतत गैरहजर राहतात, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. (प्रतिनिधी) जळगाव सपकाळ : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी साथरोगांच्या काळातही बेजबाबदारपणे वागत असल्याचा नमूना जळगाव सपकाळ येथे बुधवारी पाहावयास मिळाला. साथरोगाच्या पार्श्वभूमीवर भोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांनी आरोग्य केंद्रास भेट दिली असता, वैद्यकीय अधिकारी एस.आर. देवकाटे हे गैरहजर आढळून आले. विशेष म्हणजे त्यांचा भ्रमणध्वनीही बंद होता. तेथे उपस्थित दोन आरोग्यसेविका, औषधनिर्माता किंवा शिपाई यांना वैद्यकीय अधिकारी कुठे ? हे सांगता आले नाही.
डेंग्यूसदृश तापाने
By admin | Updated: September 4, 2014 01:23 IST