भास्कर लांडे, हिंगोलीजिल्ह्यात डेंग्यूने थैैमान घातल्याने तिघांचा बळी गेला. तर साथीच्या आजारांनी ४२२ जणांना बेजार केले. अद्यापही साथ आटोक्यात आली नसताना जिल्हा आरोग्य विभागाकडे साथीच्या रूग्णांच्या दैनंदिन नोंदीही होत नाहीत. आजपर्यंत ग्रामीण भागात कहर करणारे हे आजार आता शहरात पाय पसरत आहेत. त्यातच शनिवारी डेंग्यूसदृश्य आजाराने आणखी एक दगावल्याने भीती वाढली आहे. स्वच्छता व शुद्ध पाणीपुरवठ्याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.पिंपळदरीत डेंग्यूचा पहिला रूग्ण आढळल्याला आज महिना उलटला. तरीही साथ अटोक्यात येत नाही. उलट वेगवेगळ्या गावांतील रूग्ण समोर येताना दिसतात. दोन दिवसांपूर्वी वटकळी येथील संगीता रमेश शिंदे (वय २६) आणि माझोड येथील गंगाधर वामन मुळे (२२) यांचा डेंग्यूने मृत्यू झाला. दरम्यान, इतर साथीच्या आजारांनीही डोके वर काढले. कळमनुरी तालुक्यातील बेलथर येथे सहा जणांना गॅस्ट्रोची लागण झाली होती. महिनाभरात ५५ रूग्णांनी सामान्य रूग्णालयात उपचार घेतले. वटकळी आणि इंचा येथे अनुक्रमे १६ रूग्ण तापाने होरपळले. एकूण १२४ रूग्णांनी हिंगोलीत उपचार घेतले. आजारांनी थैमान घातले असता शासकीय यंत्रणा सुस्त आहे. गावात नियमित साफसफाई होत नाही, नाल्या उपसल्या जात नाहीत, रस्त्यावर सांडपाणी येते हेच चित्र शहरी भागातही दिसते. पं.स. व नगरपालिकांना काही देणेघेणे नाही. आजार आला की आरोग्य विभागाकडे बोट दाखवतात. दुसरीकडे आरोग्य विभाग ग्रामपंचायत स्वच्छता ठेवत नसल्याने हे आजार उद्भवल्याचे सांगून हात वर करते. जनजागृतीच्या नावाने पत्ता नसताना साथ आलीच तर त्या गावात सर्वेक्षण केले जाते. दररोज वेगवेगळ्या गावचे रूग्ण समोर येत आहेत. १९ सप्टेंबर रोजी हिंगोली तालुक्यातील सवड येथील एकाच तापाने मृत्यू झाल्याचे समोर आले. दोन्हीही सुस्त यंत्रणांचा अनेकांना फटका बसत आहे.
डेंग्यूचे ३ बळी तर साथीचे शेकडो रूग्ण
By admin | Updated: September 20, 2014 23:39 IST