सिल्लोड : पानवडोद येथील एका संस्थेत १४ वर्षे सेवा करूनही वेतन न मिळाल्याने तसेच सेवापदाला सरकारी मंजुरी न मिळाल्याने उपासमारीची वेळ आलेल्या एका शिक्षकाचा मेंदूत रक्तस्राव व पक्षाघात होऊन मृत्यू होण्याची घटना घडली. या प्रकरणी संबंधित संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेत मरण पावलेल्या शिक्षकाचे नाव पुंडलिक गणपत दांडगे (वय ४५, रा. जळकीबाजार, ह.मु. पानवडोद, ता.सिल्लोड) असे असून ते पानवडोद येथील स्वा.सै.कै. गंगारामजी मानकर प्राथमिक विद्यालयात गेल्या १४ वर्षांपासून नोकरीस होते; पण या शिक्षकास १०० टक्के अनुदान असताना संस्थाचालकाने आतापर्यंत एक रुपयाही वेतन दिले नाही. अॅप्रूव्हल पाठवले आहे, ते आल्यावर सर्व वेतन मिळेल असे त्यास सांगण्यात आले. यामुळे त्यावर उपासमीरीची वेळ आली. घरखर्च कसा चालवायचा या चिंतेमुळे त्यांना १५ दिवसांपूर्वी मेंदूत रक्तस्राव झाला. त्यात पक्षाघात झाला. त्यांना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपचार सुरू असताना त्यांचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. उपचारावर ४ लाख रुपये खर्च आला होता.मृतदेह पाच तास शाळेतशिक्षकाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह पानवडोद येथील शाळेत आणला. सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत मृतदेह शाळेत ठेवण्यात आला होता. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. यामुळे पानवडोद गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता.अखेर गुन्हा दाखलसकाळी ९ वाजेपासून सुरू असलेला वाद अखेर दुपारी २ वाजता मिटला. संस्थाचालकाने उपचारावर झालेला खर्च व मुलींच्या शिक्षणासाठी दोन लाखांचा धनादेश दिल्याने व अॅप्रूव्हलप्रमाणे वेतन निघाले, तर थकबाकी देण्यास संस्थाचालक बांधील राहील असे आश्वासन दिले, त्यानंतर अजिंठा पोलिसांनी संस्थाचालक सुभाष गंगाराम मानकर यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा भा.दं.वि. ३०६ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह शाळेसमोरून हटविला व जळकीबाजार येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.तणाव व पोलीस बंदोबस्तया घटनेमुळे पानवडोद गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी राम मांडुरके, फौजदार अनंत जगताप, सिल्लोड ग्रामीणचे सपोनि मिलिंद खोपडे, कर्मचारी अजित शेकडे, रमेश जगदाळे, सुभाष नवसारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या वेळी नायब तहसीलदार पवार, शिक्षण विभागाचे अधिकारी हजर होते. (वार्ताहर)४सदर शाळेस २००१ ला मान्यता मिळाली. ८ वी ते दहावीपर्यंत ही शाळा आहे. पहिली ते सातवीला अनुदान नाही; पण ८वी ते १०वीला २००८ मध्ये १०० टक्के अनुदान मिळाले होते. मयत शिक्षक ८वी ते १०वीला माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करीत होता, म्हणजे शाळेला १०० टक्के अनुदान असताना संस्थाचालकांच्या आठमुठ्या धोरणामुळे व तांत्रिक त्रुट्या ठेवल्यामुळे या शिक्षकाचे अॅप्रूव्हल निघाले नाही.४सदर मयत शिक्षकाने नोकरी लावण्यासाठी संस्थाचालकास अर्धा एकर असलेली शेती विकून ३ लाख ५० हजार रुपये दिले होते, त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबाकडे शेतीही राहिली नाही व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.या शाळेत माध्यमिक शाळेला १०० टक्के अनुदान असताना अनुदानित शाळेत आणखी पाच शिक्षकांना पगार नाही. यामुळे पाच शिक्षकांपैकी बापूराव शंकरराव चव्हाण (शिक्षक) व अरुण रामराव दौड (शिपाई) या कर्मचाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी संस्थाचालकाविरुद्ध औरंगाबाद येथील न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. दावा दाखल केल्यामुळे या दोन कर्मचाऱ्यांना संस्थाचालकाने दोन वर्षांपूर्वी कामावरून कमी केले आहे. ते दोन्ही कर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाकडे नजर ठेवून आहेत, अशी माहिती शिक्षक बापूराव चव्हाण यांनी दिली.
मेंदूत रक्तस्रावाने शिक्षकाचा मृत्यू
By admin | Updated: January 23, 2015 00:57 IST