जळकोट : तालुक्यातील माळहिप्परगा येथे शंकर संग्राम केंद्रे या युवकाचा खून करुन प्रेत विहिरीत टाकल्याप्रकरणी वडील संग्राम केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघाविरुद्ध रविवारी उशिरा खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे़ मयताचे वडील संग्राम रावण केंद्रे यांनी २३ जून २०१४ रोजी जळकोट पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, माझ्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे़ परंतु त्याचा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने खून करुन विहिरीत टाकले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तब्बल सहा महिन्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, तो आकस्मात मृत्यू नसून, खून झाला असल्याचे उघड झाले आहे. मयत शंकर संग्राम केंद्रे यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याचे शवविच्छेदनातून समोर आल्याचे पत्र डॉक्टरांनी पोलिसांना दिले होते़ तरीही पोलिस संभ्रमावस्थेत होते़ या प्रकरणी सहाय्यक संचालक सहकारी अभियोक्ता लातूर यांनी या खून प्रकरणातील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन योग्य तो तपास करावा, असे लेखी आदेश देताच, या खून प्रकरणातील आरोपीच्या शोध मोहिमेला गती आली़ यामध्ये गुलाब हणमंत केंद्रे, बापूराव गंगाराम केंद्रे, शंकर बापूराव केंद्रे या तिघाविरुद्ध कलम ३०२, २०१, ३४ भादंविप्रमाणे रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलिस उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनात सपोनि. चितंबर कमठेवाड, संजय कराड हे करीत आहेत़ (वार्ताहर)
६ महिन्यांनी दाखल झाला खुनाचा गुन्हा
By admin | Updated: January 13, 2015 00:13 IST