रऊफ शेख , फुलंब्रीफुलंब्री विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा विजय मिळविण्यासाठी काँग्रेस पक्षासमोर मोठे आव्हान राहणार आहे. बंडखोरीची शक्यता, तसेच कार्यकर्त्यांत अविश्वास ही प्रमुख कारणे आहेत.फुलंब्री विधानसभा मतदारसंघात डॉ. कल्याण काळे आमदार आहेत. पाच वर्षांपूर्वी फुलंब्री स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला. त्यापूर्वी हा मतदारसंघ औरंगाबाद पूर्व मतदारसंघ होता. गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे निवडून येतात. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकजुटीमुळे ते निवडून आले; पण येणाऱ्या निवडणुकीत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मतदारसंघातील राष्ट्रवादी काँगे्रसचा एक गट त्यांच्या विरोधात आहे. त्यांना समजून सोबत घेणे त्यांच्यासाठी कसोटी ठरणार आहे. शिवाय जि.प. सदस्या अनुराधा अतुल चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असल्या तरी त्यांची विधानसभेची निवडणूक लढण्याची इच्छा आहे. त्या गेल्या दोन वर्षांपासून तयारी करीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आघाडी झाली तरी त्यांची अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी आहे, असे झाले तर काँग्रेस पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम घेण्याचा त्यांनी धडाका लावला असून कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार करण्यासाठी कामाला लागल्या आहेत. याउलट औरंगाबाद व फुलंब्री तालुक्यात काँग्रेस पक्षाकडून नवीन कार्यकर्ते जोडणे, ही कामे झाली नाहीत. पक्ष वाढविण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. या शिवाय माजी मंत्री डॉ. नामदेवराव गाडेकर, शिवाजीराव पाथ्रीकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांची पक्षाला कमतरता भासेल.आ. काळे यांनी गेल्या दहा वर्षांत सिंचन, रस्ते, शेतकऱ्यांना दुष्काळात केलेली मदत, शेततळ्याची निर्मिती, सामाजिक सभागृहाचे निर्माण, सुमारे दोनशे कोटींचे बंधारे, बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खताचा पुरवठा, शेतकऱ्यांना विहिरी देणे अशी खूप कामे केली आहेत. ही त्यांची जमेची बाजू आहे. या कामांमुळेच औरंगाबाद व फुलंब्री पंचायत समित्या, बाजार समिती त्यांच्या ताब्यात आहे.औरंगाबाद पूर्व मतदारसंघ असताना भाजपाने या मतदारसंघात चार वेळा नेतृत्व केले आहे. हरिभाऊ बागडे हे आमदार, मंत्री होते. दहा वर्षांनंतरही पुन्हा हरिभाऊ बागडे बाशिंग बांधून आहेत. त्याशिवाय भाजपाकडून माजी महापौर डॉ. भागवत कराड, प्रदीप पाटील इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाचे रावसाहेब दानवे यांना फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून ३० हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही यश मिळेल, अशी आशा भाजपाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी सुरू आहे. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब डांगे, माजी अध्यक्ष भास्कर गाडेकर हे इच्छुक आहेत. मनसेचा उमेदवार उभा राहिला तर येणाऱ्या निवडणुकीत रंगत पाहायला मिळेल. २००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मते
फुलंब्रीत काँग्रेस हॅट्ट्रिकवर...
By admin | Updated: June 12, 2014 01:34 IST