औरंगाबाद : सातारा ग्रामसभेत अनेक प्रश्नांसह पाणी प्रश्न गाजला. अखेर टँकरच्या ठेकेदाराला सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी टँकरच्या फेऱ्या वाढविण्याची सूचना दिल्याने नागरिक शांत झाले. सरपंच अलका शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी बी. टी. साळवे यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविला. वाढीव टँकर आणि दक्षता म्हणून धूरफवारणी पुन्हा करावी, असे ठराव घेण्यात आले. यावेळी ग्रामसभेला माजी सरपंच फिरोज पटेल, यशवंत कदम, राजू नरवडे, विठ्ठल नरवडे, सोमीनाथ शिराणे, किशोर साबळे, राहुल शिरसाट, शिंदे आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सातारा गावाच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या विविध कामांविषयी चर्चा केली, तर नगर परिषदेपूर्वीची ही अखेरची ग्रामसभा असल्याचेही अनेकांनी बोलून दाखविले. परंतु अद्याप निर्णय शासनाकडून आलेला नाही. सातारा- देवळाई ग्रामपंचायती आता खेड्यातून शहरात रूपांतरित होत असल्याने नगर परिषदेचे वेध दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना लागले आहेत. नगर परिषदेची प्रतीक्षा केव्हा संपणार, अशी उत्सुकता सामान्य जनतेत असून, १५ आॅगस्टच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या घोषणेचा मुहूर्त काही तांत्रिक बाबींमुळे टळला असला तरी नगर परिषद होण्याचे संकेत शेवटच्या टप्प्यात आहेत. आचारसंहिता लागू नये यासाठी पदाधिकाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
सातारा ग्रामसभेत पाण्यासाठी गोंधळ
By admin | Updated: August 18, 2014 00:34 IST