रमेश कोतवाल , देवणी येथील बीएसएनएलची मोबाईल सेवा सध्या संपूर्णपणे विस्कळीत झाली असून, ग्राहकांनी याबाबत गाºहाणे मांडूनही त्याची दखल कोणी घेत नसल्याने देवणी तालुक्यातील बीएसएनएलचे मोबाईल ग्राहक वैतागले आहेत. येथील दूरसंचार खात्यातर्फे सुरू असलेल्या मोबाईल सेवेत सध्या वारंवार व्यत्यय येऊन ही सेवा पूर्णपणे कोलमडत आहे. विशेषत: सकाळ-संध्याकाळ यावेळेत तर ही सेवा पूर्णपणे बंदच असते. वीज व भारनियमन काळासाठी या कार्यालयामध्ये विद्युत जनित्र असतानाही तो चालू न करता इंधन बचत केली जाते. परिणामी, ब् बीएसएनएलच्या ग्राहकांना विनाकारण वेठीस धरले जाते. सध्या या खात्याची सेवा विस्कळीत झाल्याने एकमेकांना मोबाईलवरून कॉल न लागणे, मोबाईल बंद आहे असे दर्शविणे, कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे असे दर्शविणे, मोबाईल व्यस्त आहे, असा ठराविक यांत्रिकी संवाद ग्राहकांना ऐकविले जात आहेत. शिवाय, एकाऐवजी दुसर्याला कॉल लागणे, एकमेकांशी संवाद सुरू असताना अचानक मोबाईल बंद होणे, अशा अनेक समस्यांना ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे. बीएसएनएल कार्यालयाला या ग्राहकांकडून दर महिन्याला लाखो रुपयांचा महसूल दिला जातो. तरीही या तालुका कार्यालयाचा भार फक्त तीन कर्मचार्यांवर चालतो. तर वरिष्ठ अधिकार्यांकडे दोन-तीन तालुक्यांचा पदभार असल्याने त्यांना देवणी तालुक्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. तालुक्यातील येणार्या ग्राहकांची साधी तक्रारसुद्धा या कार्यालयामध्ये नोंदवून घेतली जात नाही. एकंदर, देवणी तालुक्यातील बीएसएनएल कार्यालयाचा कारभार रामभरोसे चालत आहे. इतके असतानाही कोण्या कार्यकर्त्यांना या मोबाईल सेवेतील अडथळ्याबद्दल सुधारणा करण्यासंदर्भात पुढाकार घ्यावा, असे वाटत नाही. येथील टॉवरची क्षमता कमी व ग्राहक जास्त झाल्याने असा प्रकार होत असल्याचे संबंधित कर्मचार्याने सांगितले. मर्यादित टॉवरमुळे ग्राहकांची गैरसोय... तालुक्यातील बीएसएनएलचा व्याप मर्यादित टॉवरवर असल्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांची गैरसोय होत आहे. फोन न लागणे, मोबाईल बंद होणे, कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे, मोबाईल व्यस्त आहे, असे यांत्रिकी संवाद ऐकवून ग्राहकांना समाधान मानावे लागत आहे. परंतु, या सेवेच्या पर्यायाबद्दल कोणीही पुढे येत नाही. बीएसएनएलच्या गैरसोयीमुळे बर्याच ग्राहकांनी नाईलाजाने इतर खाजगी कंपन्यांची सेवा घेणे सुरू केले आहे. तरीही बीएसएनएलच्या सेवेत वेळीच सुधारणा न झाल्यास देवणी येथे सर्वपक्षीय पदाधिकार्यांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. नवीन टॉवरचा प्रस्ताव दाखल... बीएसएनएलचे टॉवर कमी व ग्राहक जास्त असल्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत अनेक नागरिकांनी बीएसएनएल कार्यालयामध्ये तक्रारीही केल्या. त्यामुळे ही ग्राहकांची गैरसोय लक्षात घेऊन नवीन टॉवरचा प्रस्ताव वरिष्ठांकडे दाखल केला आहे. त्याची मंजुरी मिळताच ग्राहकांची गैरसोय दूर केली जाईल, अशी माहिती बीएसएनएलचे उपअभियंता डी.ए. कुलकर्णी यांनी दिली.
बीएसएनएलची मोबाईल सेवा विस्कळीत
By admin | Updated: May 26, 2014 00:25 IST