सोनपेठ : परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा २१ आॅगस्ट रोजी काढण्या आला. या मोर्चामध्ये शेतकऱ्यांचा लक्षणीय सहभाग होता. सोनपेठ शहरातील शेळगाव रस्त्यावरून बैलगाडी मोर्चा गुरुवारी सकाळी काढण्यात आला. हा मोर्चा शहरातून तहसील कार्यालयावर आल्यानंतर सभेमध्ये रुपांतर झाले. हा मोर्चा भाजपाचे प्रकाश सामंत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी श्यामसुंदर मुंडे, रमाकांत जहागीरदार, महादेव गिरे, शरद केंद्रे, वसंत लाखे, नारायण कच्छवे, परमेश्वर कदम, निवृत्ती यादव आदींचा सहभाग होता. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, परभणी जिल्ह्यातील सर्व तालुके टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तसेच दुष्काळग्रस्त म्हणूनही जाहीर करावे, संपूर्ण वीज बिल माफ करावे, जनावरांना मोफत चारा उपलब्ध करून द्यावा, सोनपेठ, पाथरी, मानवत तालुक्यातील गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा, तिबार पेरणीमुळे शेतकऱ्यांना खत, बियाणे, मोफत द्यावेत, शेतसारा माफ करावा, जायकवाडी माजलगाव धरणातून हक्काचे पाणी सोडावे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस माफ करावी यासह आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. (वार्ताहर)
सोनपेठ तहसीलवर बैलगाडी मोर्चा
By admin | Updated: August 21, 2014 23:19 IST