उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीत एकही जागा न मिळालेल्या भाजपाला सत्तेचे ‘टॉनिक’ चांगलेच पोषक ठरत आहे. त्यामुळेच बळ वाढत असलेल्या भाजपाने आता शिवसेनेवर थेट हल्ला चढविण्यास सुरुवात केली आहे. सहकारी पक्ष अडचणी निर्माण करीत होता. मात्र, यापुढे ‘आम्ही नाही तर तुम्हीही नाही’, अशा पध्दतीने या मित्रपक्षास उत्तर देऊ, असे सांगतानाच येणाऱ्या निवडणुकांत भाजपा आपली ताकद दाखवून देईल, असा सूर बुधवारी भाजपाच्या कार्यकर्ता बैठकीत उमटला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष आ. सुभाष देशमुख, माजी आ. गोविंद केंद्रे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अॅड. मिलिंद पाटील, संजय निंबाळकर, जि. प. सदस्य कैैलास शिंदे, संजय पाटील दुधगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात बहुतांश सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनेवर टीकेचे प्रहार केले. विधानसभा निवडणुकीत आम्ही पहिल्यांदाच कमळाच्या चिन्हावर लढलो. मात्र, तरीही प्रत्येक मतदार संघात दीड लाखांच्या घरात मते घेतल्याचे सांगत येणाऱ्या निवडणुकीत भाजपाची ताकद दाखवून देऊ, असे जिल्हाध्यक्ष काळे म्हणाले. अॅड. मिलिंद पाटील यांनीही आपल्या भाषणात सेनेला लक्ष्य केले. डरकाळी फोडणारे फोटो ते दाखवतात. मात्र, एकालाही डरकाळी फोडता येत नसल्याचे सांगत भाजपाची सुरू असलेली सदस्य नोंदणी ही पक्षाच्या विस्ताराचा पाया असल्याचे पाटील यांनी सांगितले. संजय पाटील दुधगावकर यांनी राष्ट्रवादीला ‘टार्गेट’ केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती कनेक्शन असल्याचे सांगत जिल्ह्यातील सहकारी संस्था मोडीत काढून राष्ट्रवादीने शेतकऱ्यांसमोर संकट उभे केल्याचे ते म्हणाले. मागील विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी येणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यातील एका घराण्याची सत्ता उलथवून लावू, असे दुधगावकर यांनी सांगितले. दुधगावकर यांच्या भाषणाचाच धागा धरीत संजय निंबाळकर यांनी भाषणाला सुरूवात केली. जिल्ह्यातील दुरवस्थेला फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जबाबदार नाही. काँग्रेस आणि मधुकरराव चव्हाण यांच्या कार्यपध्दतीमुळेही जिल्ह्याचा विकास खुंटल्याचे ते म्हणाले. अत्यल्प वेळ मिळाल्याने या विधानसभा निवडणुकीत पुरेसे नियोजन करण्यात आम्ही कमी पडलो. मात्र, येणाऱ्या निवडणुकांत जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात भाजपाचे कमळ फुलवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सहकारी पक्षच आमच्यासमोर अडचणी निर्माण करतो. त्यामुळे उस्मानाबादसाठी भाजपाने स्वतंत्र पालकमंत्री द्यावा, अथवा एखाद्या नेत्याने पालकत्त्व स्वीकारावे, अशी मागणीही निंबाळकर यांनी केली. माजी आ. गोविंद केंद्रे यांनी उस्मानाबादमुळेच शिवसेना-भाजपा युती तुटल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीपूर्वी स्व. गोपीनाथराव मुंडे तुळजापूरला दर्शनासाठी आले होते. त्यावेळी युती तोडा, अशी एकमुखी मागणी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळेच पुढे विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचे स्वातंत्र्य मिळाले, असे केंद्रे म्हणाले. प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर यांनी जिल्ह्याला पर्याय हवा होता, तो आम्ही दिल्याचे सांगितले. महाराष्ट्रासह देशात भाजपाचे वारे वाहत आहे. यापुढील काळात जिल्हाही भाजपामय झाला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने सदस्य नोंदणीत सक्रीय सहभाग नोंदविण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)दक्षिण सोलापूरचे आ. सुभाष देशमुख यांनी जिल्हा काँग्रेसमुक्त करा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. विधानसभा निवडणुकीत आम्ही स्वतंत्र लढलो. मात्र, त्याचे ट्रेलर त्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत मी दाखविले होते, असे सांगितले. कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवावी लागते. लोकसभा निवडणुकीत ती बंदूक माझ्या खांद्यावर होती, अशा शब्दात त्यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर केलेल्या कुरघोडीची कबुली दिली. विशेष म्हणजे, सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे संपल्यानंतर संजय निंबाळकर यांनी पुन्हा माईक ताब्यात घेतला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही मित्रपक्षाला आमची ताकद दाखवू. खासदारांवर माझे खास प्रेम आहे. त्यामुळे विधानसभेबरोबरच मित्रपक्षाला लोकसभेतही हिसका दाखवू, असे त्यांनी सांगितले.
भाजपाच्या निशाण्यावर सेना
By admin | Updated: February 5, 2015 00:53 IST