बीड : जिल्हा परिषदेतील अनियमिततेच्या चौकशीसाठी विशेष लेखा परिक्षणाचा ससेमिरा सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सीईओ नामदेव ननावरे यांनी अभिलेखे तात्काळ उपलब्ध करा, अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जा.. अशी तंबी गुरुवारी विभागप्रमुखांना दिली आहे.जि.प. मधील अनियमिततेविरुद्ध मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर चौकशी समित्यांमार्फत झाडाझडती झाली होती़;परंतु कारवाई झालीच नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने अहवालात अनेक गंभीर आरोप केले होते. नूतन सीईओ नामदेव ननावरे यांनी लेखापरिक्षणाची मागणी नोंदविली होती. त्यानंतर लेखा विभागाने ‘ग्रीन सिग्नल’ दिला. त्यानुसार जि.प. मध्ये लवकरच विशेष लेखापरिक्षण होत आहे.रोखपुस्तिका, पावत्या, प्रमाणके, प्रशासकीय मान्यतेचे आदेश, जि.प. व प. सं. अधिनियम १९६८ नुसार आवश्यक त्या सर्व संचिका व नोंदवह्या, शासनाकडून प्राप्त अनुदान, बँक स्क्रोल, सर्व प्रकारच्या खरेदीविषयक आदेश व संचिका, मंजूर पदांचे आकृतीबंध, टोकन नोंदवही, लेखाशिर्षनिहाय जमाखर्च, वार्षिक प्रशासन अहवाल व इतर महत्त्वाची कागदपत्रे अद्यावत ठेवून लेखा परिक्षणावेळी उपलब्ध करुन द्यावेत, असे फर्मान सीईओ ननावरे यांनी सोडले आहे. संचिका सहा बंडल पद्धतीनुसारच असली पाहिजे, अशा सूचनाही आहेत. विशेष लेखा परिक्षणासाठी आलेल्या पथकाला असहकार्य केल्यास राज्य स्थानिक निधी लेखा १९३० च्या नियमावलीनुसार संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध दंडात्मक, फौजदारी, खातेनिहाय चौकशी अशा स्वरुपाची कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)
अभिलेखे द्या, अन्यथा फौजदारी !
By admin | Updated: December 19, 2014 00:58 IST