औरंगाबाद : राज्य सरकारचे महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान सुरूहोऊन दोन महिने उलटले; पण आतापर्यंत विभागातील १६८२ पैकी बाराशे गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांना सुरुवात झाली आहे. चारशेपेक्षा जास्त गावांमध्ये अजूनही कोणतेही काम सुरू झालेले नाही. मराठवाड्यासह राज्यातील इतरही काही जिल्ह्यांमध्ये सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करून संपूर्ण राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अभियानासाठी पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील १६८२ गावांची निवड करण्यात आली आहे. हे अभियान सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अद्याप चारशेपेक्षा जास्त गावांमध्ये जलसंधारणाची कामे प्रशासनाकडून सुरू झालेली नाहीत. उर्वरित बाराशे गावांमध्ये गाळ काढणे, कंपार्टमेंट बंडिंग, नालाबंडिंग, पाझर तलाव यांसारखी कामे सुरू झाली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात या अभियानासाठी २२८ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ३२ गावांमध्ये अजून एकही काम सुरू झालेले नाही. जालना जिल्ह्यात याहीपेक्षा वाईट परिस्थिती आहे. येथे २०९ गावांपैकी १०६ गावांमध्येच कामे सुरू होऊ शकली आहेत. बीड जिल्ह्यातही २७८ पैकी ६३ गावांमध्ये कोणतीही कामे सुरू झालेली नाहीत. परभणी जिल्ह्यात १७० गावे निवडण्यात आलेली आहेत. याठिकाणी मात्र सर्व गावांमध्ये कामे सुरू झालेली आहेत. लातूर जिल्ह्यातही अभियानासाठी निवडलेल्या सर्व २०२ गावांमध्ये कामे सुरू झाली आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात २१७ गावे निवडली असून येथे सर्व गावांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
चारशे गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार’ला सुरुवातही नाही
By admin | Updated: April 1, 2015 01:04 IST