चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन, असे जाहीर सभांमधून सांगणार्या ना.देवतळेंनी आता राजकीय सन्यास घ्यावाच, असे आव्हान पुगलिया गटाने दिले आहे. राजुरा येथील गांधी भवनात ३ मे रोजी ना.संजय देवतळे यांनी आभार सभा घेतली. या सभेत वरोरा विधानसभा मतदार संघात मी मताधिक्य घेऊनच राहीन. जर तसे झाले नाही तर आमदार, मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकीय सन्यास घेईन, असे जाहीर वक्तव्य केले होते. आता तोच धाग पकडून पुगलिया गटाने देवतळेंना राजकीय सन्यास घेण्याचे आव्हान पत्रकातून दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्टÑीय कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या यवतमाळ येथील जाहीर सभेत खोट्या तक्रारी करून प्रामाणिक पदाधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी पक्षश्रेष्ठींना बाध्य केल्याचा आरोपही देवतळेंवर पत्रकातून करण्यात आला आहे. आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांशी आकसबुद्धीने वागून गटबाजीला खतपाणी घातले. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसून आला, असेही पुगलिया गटातील पदाधिकार्यांनी पत्रकात म्हटले आहे. आपण खरेच प्रामाणिक, नितीमान व शब्दाला जागणारे असाल तर आमदारकी व मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकीय सन्यास घ्यावा व आपला बाणेदारपणा कृतीतून सिद्ध करावा, असे आव्हान पत्रकातून दिले आहे. या पत्रकावर महापौर संगीता अमृतकर, गजानन गावंडे, रजनी मुलचंदानी, महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती रितेश तिवारी, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती उषा धांडे, घनश्याम मुलचंदानी यांच्या स्वाक्षर्या आहेत. (प्रतिनिधी)
देवतळे दिलेला शब्द पाळतील काय?
By admin | Updated: May 18, 2014 23:28 IST