सिग्नल सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : येथील वरोरा नाका, वडगाव, मिलन चौकातील सिग्नल बंद असल्याने अपघाताची शक्यता आहे. विशेश म्हणजे, वरोरा नाका चौकात नव्याने उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे या चौकाला विशेष महत्त्व आले आहे. मात्र, येथून धरधाव वेगाने वाहन नेणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे प्रशासनाने येथे सिग्नल सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.
झाडामुळे उड्डाणपुलाला धोका
चंद्रपूर : वरोरा नाका परिसरात असलेल्या उड्डाणपुलावर झाड उगवल्यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. सदर पुलावरील झाड तोडण्याची मागणी करण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून येथे झाड असूनही याकडे संबंधित विभागाचे लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्वच्छतेअभावी नागरिक हैराण
चंद्रपूर : शहरातील काही वॉर्डांत घाणीचे साम्राज्य आहे. बिनबा वॉर्ड, बंगाली कॅम्प, बाबूपेठ, तसेच पठाणपुराव गेटसमोरील परिसरात सर्वत्र कचरा साचला आहे. घाणीमुळे रोगराई पसरली असून, डासांचे प्रमाण वाढले आहे. मनपाने येथे स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.
आझाद बाग सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : येथील आझाद बाग मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे येथे नियमित येणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथील दुरुस्तीचे काम पूर्ण करून आझाद बागसुद्धा खुला करावा, अशी मागणी केली जात आहे.
हातपंप दुरुस्तीकडे लक्ष द्यावे
जिवती : तालुक्यातील अनेक गावांचे हातपंप नादुरुस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. ग्रामपंचायतींनी संबंधित विभागाकडे निवेदन दिले. मात्र, दुरुस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.