शिक्षक संघाचा इशारा : शिक्षण विभागाचे दुर्लक्षगोंडपिपरी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, सर्वांगीण शैक्षणिक, गुणवत्ता विकास कार्यक्रम यासारखे उपक्रम राबवून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सतत तत्पर असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांवर गोंडपिपरी शिक्षण विभागाच्या वतीने अन्याय केला जात आहे. प्राथमिक शिक्षकांच्या बऱ्याच समस्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहेत. शासन निर्देशानुसार दर तीन महिन्यांनी समस्या निवारण सभा घेणे अनिवार्य आहे. परंतु सत्र संपत असतानासुद्धा समस्या निवारण सभा घेण्यात आली नाही. असे असतानाही अखिल गोंडपिपरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने वारंवार निवेदन देवून समस्या निवारण सभा घेण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात यावे, अशी जाणीव करून दिल्यानंतरही पंचायत समिती शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांकडून हेतुपुरस्पर टाळाटाळ केली जात आहे, निवेदनाला केराची टोपली दाखवली जात आहे. याबाबत विचारणा केली असता कर्मचाऱ्यांकडे उडवाउडवीचे व बेताल उत्तर दिले जात आहे. ही शिक्षण विभागाची शोकांतिका आहे. शिक्षण विभागातील कर्मचारी कुंभकर्णाची झोप घेत असल्याने तालुक्यातील शिक्षकांच्या समस्यांचा ढीग साचला आहे. कोणत्याही क्षणी त्याचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा निवेदनातून दिला आहे. संवर्ग विकास अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत दखल घेऊन त्या निकाली काढण्यात व भविष्यात होणाऱ्या स्फोटक परिस्थितीला टाळावे, अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचाही इशारा निवेदनातून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षकांच्या समस्या सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन
By admin | Updated: March 21, 2016 00:44 IST