रेडियमअभावी अपघाताची शक्यता
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम नसल्याने रात्रीच्यावेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाचे दिवस आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची मागणी
चंद्रपूर : येथील तुळशीनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथील रस्त्यांची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
जिल्ह्यातील सौर दिवे दुरुस्त करावे
चंद्रपूर : शासनाने लाखो रुपये खर्च करून जिल्ह्यातील विविध गावात सौर पथदिवे सुरू केले. मात्र यातील अर्धेअधिक सौरदिवे बंद अवस्थेत आहे. दरम्यान, काही सौर दिव्यांच्या बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.
सिग्नल सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : येथील काही चौकातील सिग्नल सुरू नसल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका तसेच वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन शहरतील सिग्नल सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. येथील ट्रायस्टार हॉटेलजवळ तसेच मिलन चौकांमध्ये सिग्नल आहे. मात्र ते बंद अवस्थेत आहे.
रस्ते, नाल्यांचे बांधकाम अजूनही अर्धवट
चंद्रपूर : बंगाली कॅम्प परिसरातील श्यामनगर, इंदिरानगर परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, नाल्यांचे बांधकाम अर्धवट आहे. पावसाळ्यातील रस्त्यावर पाणी साचून राहते. त्यामुळे स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
तुकूम परिसरातील नागरिक त्रस्त
चंद्रपूर : शहरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीने जात असताना हे मोकाट कुत्रे अचानक गाडीवर झेप घेतात. यामुळे अपघातही वाढले आहेत. तुकूम परिसरात मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने संताप व्यक्त केला जात असून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
नाल्यांमध्ये झुडपे वाढली
चंद्रपूर : ऊर्जानगर ते नागपूर रोडकडे वाहनाऱ्या नाला परिसरात मोठ्या प्रमाणावर झुडपे वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी येथे वाघ दिसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या झुडपांची छाटणी करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा ताण वाढला
चंद्रपूर : चंद्रपूर शहरालगत असलेल्या पडोली तसेच अन्य पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने येथील कर्मचाऱ्यांना कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
फायबर गतिरोधकामुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : अपघाताला आळा घालण्यासाठी प्रशासनाने चंद्रपूर-नागपूर रोडवरील हुतात्मा स्मारक परिसरात फायबर गतिरोधक लावले आहे. मात्र ते अर्धेअधिक तुटले असून यामुळेच अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते काढून नव्याने बसवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मनपाच्या दुर्लक्षाने अतिक्रमण वाढले
चंद्रपूर : शहरातील गांधी मार्ग तसेच कस्तुरबा मार्गावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
खुल्या जागांचा विकास करा
चंद्रपूर : महानगरपालिका मागील वर्षी शहरातील ओपस स्पेसचा विकास करून त्यामध्ये बाग उभारली, तर काही ठिकाणी खेळण्याचे तसेच व्यायामाचे साहित्य लावून विकास केला होता. मात्र सध्या हे काम थंडावले आहे. त्यामुळे शहरातील ओपन स्पेसचा विकास करण्याची मागणी केली जात आहे.
नामफलक नसल्याने प्रवाशांची अडचण
चंद्रपूर : जिल्ह्यातून अनेक राज्य महामार्ग, तालुका मार्ग, ग्रामीण मार्ग गेले आहेत. मात्र यातील बहुतांश रस्त्यावर गावाच्या नावाचा फलक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
बालाजी वाॅर्डातील रस्त्यावर दुर्गंधी
चंद्रपूर : येथील बिनबा गेट रोड बजाज पॉलिटेक्निक कॉलेजजवळील चौकामध्ये कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्यावरून मोठ्या संख्येने रेलचेल असते. मात्र दुर्गंधीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. महानगरपालिकेने याकडे विशेष लक्ष देऊन नियमित कचरा साफ करावा, अशी मागणी होत आहे.
प्रदूषणावर आळा घालण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांतून निघणाऱ्या धुरांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे. त्यामुळे या प्रदूषणाच्या समस्येवर लवकरात लवकर आळा घालण्याची मागणी चंद्रपुरातील जनतेने केली आहे.