चंद्रपूर : शेतीला सिंचन, परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी चंद्रपूर येथून केवळ आठ किलो मीटरवरील शिवणी चोर येथे वर्धा नदीवर बंधारा बांधण्याची मागणी गावकर्यांनी केली आहे. वर्धा नदीपट्ट्यातील जमीन सुपीक असून, शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास येथील शेती समृद्ध होऊ शकते. २० वर्षापूर्वी हडस्ती, धनोरा पिंपरी आणि शिवणी येथे वर्धा नदीवर जलसिंचन योजना कार्यरत होती. मात्र कालांतराने या तिन्ही योजना बंद पडल्या. या परिसरात वेकोलि, भूमिगत खाणीमुळे, भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. या पार्श्वभूमीवर शिवणी येथे वर्धा नदीवर बंधारा झाल्यास परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासोबतच नदीपलीकडे राजुरा व कोरपना, तालुक्यातील गावांसोबतच चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील गावांनाही सिंचनाचा लाभ होऊन पिण्याच्या पाण्याचीही सोय होईल. २००३ मध्ये शिवणी मार्डा परिसरात बॅरेज बांधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, पाठपुराव्याअभावी हा प्रस्ताव रखडला आहे. वर्धा, नदीपट्ट्यातील आजवर अत्यंत मागास राहिलेल्या या भागात कोणताही सिंचन नसल्यामुळे या परिसरातील शेतजमीन सुपिक असूनही सिंचनापासून वंचित राहिलेला आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील सिमेंट उद्योग औष्णिक वीज प्रकल्प, पोलाद उद्योग भविष्यातील पाण्याची निकड विचारात घेऊन शेती सिंचन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता वर्धा नदीवर बंधारा बांधावा, अशी मागणी ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे. (नगर प्रतिनिधी)
वर्धा नदीवर बंधारा बांधण्याची मागणी
By admin | Updated: May 18, 2014 23:30 IST