१ हजार २१९ एकर शेतीचे केले नंदनवन : ८ बंधारे, २४ तलाव, १९ विहिरीराजू गेडाम मूलघोषणाच्या दगडावर ठेचाळत जाणाऱ्या देशाला विकासाच्या राजरस्त्यावर आणायचे असेल तर तेथे नवा आचार-विचार रूजवला पाहिजे, असे मत व्यक्त करणारे कुष्ठरोग्यांचे मसिहा बाबा आमटे यांनी सोमनाथ येथे नवनवीन कल्पना साकारून बारमाही शेतीचे ज्वलंत उदाहरण निर्माण केले आहे. वरूणराजाच्या अवकृपेने कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट ओढविण्याआधीच आवश्यक तेथे बंधारे बांधुन पावसाचे पाणी अडविण्याचा व तलावात बारमाही शेती करता येईल, अशी सिंचन व्यवस्था निर्माण केल्याचे सोमनाथ येथे बघायला मिळते. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जल शिवार योजना बाबा आमटे यांनी २५ वर्षापूर्वी सोमनाथ येथे साकारल्याने १ हजार २१९ एकर जमिनीत धानासोबत विविध पालेभाज्या, फळभाज्या, पशुपालन, दुग्ध व्यवसाय आदींनी परिपूर्ण झाल्याचे दिसून येते. बाबा आमटे हे सन १९६७ ला सोमनाथला आल्यानंतर शासनाने ताडोबा जंगलातील १९२४ एकर जमीन महारोगी सेवा समितीला दिली. परिसरातील शेतकऱ्यांना ५५३ एकर शेती दिल्यानंतर समितीकडे १ हजार २१९ एकर खडतर जमीन शिल्लक राहिली. जंगलातील खळतर जमीन असताना या जमिनीत परिश्रमातून नंदनवन फुलवू शकतो, हा आत्मविश्वास बाबा आमटे यांना असल्याने त्यांनी प्रयत्नातुन जे हवयं ते साकारलं. जंगलात बंधारा बांधुन पाणी अडविण्याचे व पाण्याचा स्त्रोत वाढविण्याचे काम त्यावेळी करण्यात आले. जमिनीला मृत स्वरूप देण्यासाठी आपल्या सहकार्याच्या माध्यमातून त्यांनी शेती योग्य जमीन तयार केली. त्यावेळी सोमनाथ जंगलात विविध हिरण श्वापदांचा वावर असताना देखील त्याकडे लक्ष न देता आपले अविरत काम सुरू केले. त्यामुळे खळताड जमिनीत ‘अंकुर’ फुटायला लागले. ही कल्पना बाबा आमटेनी आपल्या कल्पनेतून साकारली. पावसाचे पाणी योग्य पद्धतीने अडवले तर शेतीला बारमाही पाणी मिळू शकते हा आत्मविश्वास त्यांचा होता. सन २००९-१० मध्ये दुष्काळाचे सावट असल्याने या वर्षात ताडोबा जंगलातील मोठ्या नटराजवळ ‘स्वरानंद’ हा रंजनी कार्यक्रम मुंबई येथे आयोजित करून मिळालेल्या १७ लाख रुपयातुन टायर व सिमेंटनी पक्का बंधारा बांधला. या बंधाऱ्यातील पाणी अडल्याने खालचा तलाव, विहीरी यांचे जलस्त्रोत वाढले. या सिमेंट बंधाऱ्यामुळे पुन्हा ६ लहान बंधारे, १६ मोठे तलाव, ६ लहान तलाव, ६ पिण्याच्या पाण्याच्या विहीरी, १३ शेतीच्या विहीरी भरगच्छ भरल्या. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्याने आज सोमनाथ येथे ९०० ते १००० एकर शेतीत धान पीक घेतले जाते. जवळपास ४ हजार ५०० क्विंटल धानाचे उत्पादन घेतले जात असून बाजार भावाप्रमाणे दीड कोटीचे धानाचे उत्पादन होते. तर जवळपास २० लाखाचे भाजीपाला पीक उत्पादन केला जातो. दुध, पशुपालन, मत्स पालन आदी केल्याने दुधाची निर्मीती होत आहे. तसेच माशांचे सुद्धा उत्पादन होऊन आर्थिक भर पडल्याचे दिसून येते. आज बाबा आमटे नसले तरी डॉ. विकास आमटे यांची वेळोवेळी सोमनाथ येथे भेट होऊन संपुर्ण १ हजार २१९ एकर शेतीचा परिसर हुडकून काढतात. त्यांच्या सोबतीला सोमनाथ येथील अरुण कदम, हरिभाऊ बढे हे विशेष लक्ष घालत असल्याने सोमनाथ येथे ‘हरितक्रांती’ झाल्याचा भास होताना दिसतो. शासनाने जलयुक्त शिवार योजना या वर्षात सुरू केली असली तरी बाबा आमटे यांच्या ‘सोमनाथ’ येथे २५ वर्षापूर्वीच मुहुर्तमेढ रोवली गेली होती.
बाबा आमटेंनी २५ वर्षांपूर्वीच साकारले जलशिवार
By admin | Updated: October 9, 2015 01:43 IST