जि.प. शाळेत विज्ञान व वाणिज्य शाखा बंद : लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी मांडल्या समस्यातुमसर : पूर्व विदर्भातील शेवटच्या टोकावरील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सुविधा नाही. सावित्रींच्या लेकींना येथे शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे. ८० च्या दशकात जिल्हा परिषद शाळेत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे वर्ग सुरु करण्यात आले. त्यापैकी केवळ कला शाखा सुरु आहे. ३५ ते ४० कि.मी. अंतरावर तुमसर येथे शिक्षणाकरिता पायपीट करावी लागते. नाकाडोंगरी येथे जिल्हा परिषदेची १९५५ पासून शाळा सुरु आहे. तुमसर तालुक्यातील एकमेव कनिष्ठ महाविद्यालय आहे. वर्ग ५ ते १२ पर्यंत येथे वर्ग आहेत. सन १९८० मध्ये वर्ग ११ व १२ येथे सुरु करण्यात आले होते. सुरूवातीला कला, वाणिज्य व विज्ञान शाखा येथे होत्या. पाच वर्षानंतर वाणिज्य विज्ञान शाखा बंद झाल्या. विद्यार्थी येथे मिळत नव्हते. कला शाखेच्या दोन तुकड्या आहेत. २० ते २५ गावात हे एकमेव जिल्हा परिषदेचे कनिष्ठ महाविद्यालय आहे. या परिसरातील आष्टी, चिखला, गोबरवाही, सीतासावंगी, डोंगरी, नाकाडोंगरी येथे नऊ हायस्कुल आहेत. कला शाखेत प्रवेश बंद झाल्यावर तुमसर येथे विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता जावे लागते. वाणिज्य व विज्ञान शाखा नसल्याने अनेक होतकरु गुणवंत विद्यार्थी तुमसर येथे जातात तर काहींना नाईलाजास्तव शिक्षण सोडून द्यावे लागत आहे. शिक्षण अर्धवट सोडून देणाऱ्यात विद्यार्थिनींचा सर्वाधिक समावेश आहे. मध्यमवर्गीय, गरीब विद्यार्थ्यांना दररोज ३५ कि.मी. दूरवर शाळेत जाणे न परवडणारे आहे. सध्या विज्ञान व संगणकांचे युग आहे. विज्ञान शाखेची सोय नाही. सन १९८० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी विशेष बाब म्हणून तीनही शाखांना येथे परवानगी दिली होती. जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष दादा शेंडे, येथील तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य ग्यानीराम गौपाले यांनी ही समस्या शरद पवारांकडे मांडली होती. सन २०१६ मध्ये भंडारा जिल्ह्यात लाखनी येथे जि.प. कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखा सुरू करण्यात आली. विज्ञान शाखा सुरु करण्याकरिता केवळ एका विषय शिक्षकाची गरज आहे. स्थानिक नागरिकांनी जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी राहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य संगीता मुंगुसमारे, संगीता सोनवाने यांच्याकडे ही समस्या मांडली आहे.ग्यानीराम गौपाले, उपसभापती शेखर कोतपल्लीवार, शालीक गौपाले, सुरेश राहांगडाले, ठाकचंद मुंगुसमारे, दिलीप सोनवाने, निरंजन गौपाले, नरेंद्र गौपाले, कपील जैन यांच्यासह सह स्थानिकांनी ‘लोकमत’ समोर व्यथा मांडल्या. (तालुका प्रतिनिधी)
सावित्रीच्या लेकींना तिथे घ्यावे लागते अर्धवट शिक्षण
By admin | Updated: September 28, 2016 00:35 IST