१० महिन्यांतील कारवाई अवैध वाहतूकप्रकरणी ४४ जणांविरुध्द गुन्हा १ हजार २६ प्रकरणेदेवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यात रेती, गौण खनिजांचा विपुल साठा आहे. स्वामित्वधनाची मालमत्ता जपण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी महसूल प्रशासनाची असताना रेती व इतर गौण खनिजाची चोरी सर्रासपणे सुरू आहे. चोरट्यांवर आळा बसावा, यासाठी महसूल विभाग व जिल्हा खनिकर्म विभागाच्यावतीने मोहिम राबविण्यात येते. जिल्ह्यात सन २०१५-१६ मध्ये जानेवारीपर्यत रेती व इतर गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतुकीच्या १,०२६ प्रकरणात कारवाई करण्यात आली. त्यापासून १ कोटी ८६ लाख ७१ हजार ३३० रुपयांचा महसूल शासनाला प्राप्त झाला आहे. खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या ४४ जणांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गतवर्षी १ कोटी २९ लाख ७२ हजार ५११ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या रेतीला विदर्भात मोठी मागणी आहे. सध्यस्थितीत शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहेत. बांधकामासाठी रेती, गौण खनिजांची अंत्यत आवश्यकता असते. गौण खनिजांची आवश्यकता व त्यांची गगणाला भिडलेले दर लक्षात घेता भंडारा जिल्ह्यासह परजिल्ह्यातील चोरट्यांची साखळी आहे. जिल्ह्यातील अनेक रेती घाटांचे लिलाव झालेले नाही, अशा घाटांवरुन रेतीचे उत्खनन नियमित सुरु आहे. दररोज शेकडो वाहनाने रेती चोरी सर्रास सुरु आहे. यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. दिवसरात्र रेतीची वाहतूक होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बेभान धावणाऱ्या रेतीच्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यांच्या कर्कश आवाजामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. रेती, इतर गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात महसूल, पोलीस व परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अवैध उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात 'अर्थ'पूर्ण घडामोडी घडत असतानाही जिल्हा प्रशासन यापासून अनभिज्ञ का, असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्ह्यात सन २०१५-१६ मध्ये जानेवारी २०१६ पर्यत १ कोटी ८६ लाख ७१ हजार ३३० रुपयांचा महसूल शासनाला प्राप्त झाला आहे. मागीलवर्षी सन २०१४-१५ मध्ये माहे एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ पर्यत रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुकीच्या १,७६५ प्रकरणात कारवाई करण्यात आली. त्यापासून १ कोटी १७ लाख ५१ हजार ९२२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. तसेच दगड, गिट्टी, माती व मुरुमाच्या अवैध उत्खननाबाबत २६२ प्रकरणात कारवाई करण्यात आली त्यापासून १२ लाख २० हजार ५८९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी जानवारीपर्यत ५६ लाख ९८ हजार ८१९ रुपयांचा महसूल अधिक झाला आहे. प्रशासनाची कारवाई पाहता यावर्र्षी महसुलात प्रचंड वाढ होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाकडून प्रामाणिक कारवाईची गरज आहे.तालुकास्तरावर उभारण्यात आले 'चेकपोस्ट'भंडारा जिल्ह्यात जिल्हास्तरीय पथकाद्वारे मौजा शहापूर, सातोना, जांब कांद्री, निलज फाटा, मंगरली व टी-पॉर्इंट लाखांदूर येथे चेक पोष्ट उभारण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील भरारी पथकात नायब तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक, मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी यांची नेमणुक करण्यात आली आहे. तालुकास्तरावर चेकपोष्ट व भरारी पथके तयार करण्यात आले आहे. तालुकास्तरावर भंडारा ५, मोहाडी ५, तुमसर ३, पवनी २, साकोली २, लाखनी २ या ठिकाणी चेकपोष्ट उभारण्यात आले आहे. ज्या रेतीघाटामधून रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक होऊ शकते. अशा संभाव्य ठिकाणी चौकी स्थापीत करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. चौक्यावर नोंदवही ठेवून त्यामध्ये अवैध उत्खनन व वाहतूक करताना वाहन आढळून आल्यास सदर नोंदवहीत वाहन मालकाचे नाव, वाहनक्रमांक, चालकाचे नाव, किती प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत आहे याची नोंद घेण्यात येत आहे.अवैध उत्खनन व वाहतूक करणारे वाहन पकडल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सुचना देवून अतिभार व इतर बाबी तपासण्याबाबत कळविण्यात येते. जेणेकरुन वाहनावर त्यांच्याकडून स्वतंत्र रित्या कारवाई होवू शकते. सर्व रेतीघाटावरील रस्त्यावर खड्डे (चर) करण्याविषयी सर्व तहसीलदारांना कळविण्यात आले आहे. रेती घाटावरुन यांत्रिक साधने हटविण्याविषयी अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. अवैध उत्खनन व वाहतूकीवर आळा घालण्यासाठी जे घाट लिलावात गेले नाही, अशा सर्व रेतीघाटांवर फौजदारी संहितेचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.- सं. श्री. जोशी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, भंडारा
रेती, गौण खनिजातून १.८७ कोटींचा महसूल
By admin | Updated: February 16, 2016 00:46 IST