भाजपचा मोर्चा : दोषींवर कारवाईची मागणीभंडारा : दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या एका गटाने संसद हल्ल्यातील मुख्य आरोपी अफजलगुरुच्या फाशीला वर्ष झाल्याबद्दल कार्यक्रम घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतंत्र काश्मीरची मागणी करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी अपशब्द वापरले. या घटनेची संतप्त पडसाद सर्वत्र उमटले. शहरात शनिवारी भाजप अल्पसंख्यक सेलतर्फे मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. देशद्रोही कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांनी समर्थन देण्याचा प्रकार होत असतांना विद्यापिठाने अशा कार्यक्रमाला मान्यता देण्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. त्या विद्यार्थ्यांना भारतीय संविधान व एकतेवर विश्वास व आस्था नाही यापूर्वीसुध्दा अशा प्रकारच्या घटना विद्यापीठ परिसरात घडल्या आहेत. महिषासूर दिन साजरा करणे, आंतरराष्ट्रीय वेदांत संमेलनात योग गुरु रामदेव बाबांचा विरोध आदी बाबींमुळे त्यांची विचारधारा देश व समाजद्रोही असल्याचे भाजपने पत्रकात नमूद केले आहे. भारतीय संस्कृतीचा विपर्यास व मोडतोड करुन चुकीचे तत्थ्य मांडणे, देश विघातक कृत्यांना समर्थन देण्याचे कार्य गेल्या काही वर्षात या विद्यापिठातील विद्यार्थी करीत आहेत. दोषी असलेले विद्यार्थी व प्राध्यापकांवर कारवाई व्हावी, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र भाजप अल्पसंख्याक मोर्च्याचे प्रदेश सचिव हाजी मो. आबीद सिद्दीकी यांनी केली आहे. यावेळी काढण्यात आलेल्या निषेध मोर्च्यात विकास मदनकर, चंद्रशेखर रोकडे, सूर्यकांत इलमे, कलीम खान, संजय मते, इरशाद खान, बाबा पटेल, अकिलभाई, इकबालभाई, अन्वर सिद्दीकी, अमजद हुसैन, नितीन धकाते, आशिष मोहबे, शैलेंद्र श्रीवास्तव यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
जेएनयूतील घटनेचा भंडाऱ्यात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 00:48 IST