पाण्याची पातळी खालावली: विहिरी पडल्या कोरड्या, २०० फुटाच्या खोलीतून पाणी उपसामुखरू बागडे पालांदूर भूजल साठा संपन्न समजल्या जाणाऱ्या वैनगंगा व चुलबंद नदीच्या खोऱ्यात वाढत्या तापमानामुळे व पाण्याच्या अतोनात उपशामुळे जलस्त्रोत कमी झाला आहे. ६० फुटापर्यंतच्या विहिरी एप्रिलच्या शेवटच्या हप्त्यात कोरड्या पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची दाहीदिशा सुरू झाली आहे. तर शेतातील उभी पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केवीलवाणी धडपड सुरू आहे. लाखनी तालुक्यातील १०४ गाव टँकरमुक्त जरी वाटत असली, तरी पिण्याच्या पाण्यासाठी एप्रिलच्या मध्यापासूनच धावपळ करावी लागत आहे. शासनाकडून बऱ्याच गावांच्या विकासाकरिता लखोंचा निधी मिळाला खरा पण पैशाचा अपव्यय झाल्याने सिंचनाची पर्यायाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक तहानलेलीच दिसत आहे. खासदार प्रफुल पटेल यांनी सीएसआर अंतर्गत कित्येक गावांना बोअरवेल्स देत पाणी टंचाईला दूर करण्याचा थोडाफार प्रयत्न केला. तर माजी जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत यांनी खासदार नाना पटोले यांच्या निधीतून जिल्हा परिषद क्षेत्रात बोअरवेल्स तयार करीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी काही प्रमाणात हातभार लावला. भारत निर्माण पेयजल अंतर्गत पालांदूरात १ कोटी २४ लक्ष रुपये खर्च करून नळयोजना आणली. परंतु २ लक्ष लिटर साठवणूक क्षमता असूनही दररोज नळाला पाणी मिळत नाही. बऱ्याच घरी टिल्लू पंपचा सर्रास वापर दिसत असताना कारवाई शून्य असल्याने पाणी वाटपात विषमता आहे. सार्वजनिक, खासगी विहिरींनी तळ गाठला असून मे महिना पूर्ण हिट असल्याने समस्या आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत सध्याच्या स्थितीवरून दिसून येत आहे. ४५ अंशावर असलेले तापमान पुढे कितीचा आकडा पार करतो हे सांगणे भयावह असून चिंतनीय आहे. जिल्ह्याच्या अंगणात माथ्यावर वैनगंगा दुथडी भरली आहे. तिचे पाणी चुलबंदला सोडून गुरांना पशुपक्षांना व विहिरींना अम्रृत ठरेल अशी आस प्रभावित जनतेला लागलेली आहे. धनिक शेतकरी रोजच बोअरवेल्स खोदत भुजलाशी मनमानी करीत आहेत. बोअरवेलला खोदताना प्रशासनाची चुप्पी असल्याने भूजल साठा भविष्यात आटून पाण्याकरिता युद्ध होणार असे संकेत दिसत आहेत. नियमावली कागदावरच असून अंमलबजावणी शून्य झाल्याने यांत्रिक बोअरवेल्स बिनधास्तपणे पैशाच्या लोभापाई भूजलाशी खेळत आहेत. अशा प्रकाराला पायबंद घालणे काळाची गरज आहे. शेतीसोबतच पशुपक्षांनाही फटकातापमानामुळे पशुपक्ष्यांसोबत शेतीव्यवसायही प्रभावित झाली आहे. बेसुमार पाणी उपशामुळे विहिरींनी तळ गाठल्याने कित्येक शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पिके करपू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक हातात येईल ही आशा आता सोडली आहे. गर्भात असणारे धान पाण्याविना गर्भातच राहिले तर कसेबसे फुललेले धान भरलेलेच नाही. ७० ते ८० गावे जलसंकटातहजारो एकरातील धान पाण्याविना प्रभावित झाल्याने शेतकरी पुरता संकटात आला आहे. तीळसंक्रांत पासून चुलबंद नदी व लहान मोठी नाले कोरडी पडल्याने पालांदूर परिसरातील ७०-८० गावी जलसंकटात सापडली आहेत. बंधाऱ्याचा शून्य उपयोग झाल्याने पाणी अडवा पाणी जिरवा तूर्तास तरी फोल ठरले आहे. शेतकऱ्यांनी कमी पाण्याचे पिके निवडून अत्याधुनिक सोईद्वारे सिंचन सुविधा वापरावी. जेणेकरून अत्यल्प पाण्यात पिक टिकवून उत्पन्न घेता येईल. रब्बीची शेती हिशेबाने करीत पाणी नियोजन अत्यंत महत्वाचे आहे. आजची चुक, उद्या न करता प्रत्येक दिवशी पााण्याचा हिशेब सांभाळा.- मंगेश घोळके, मंडळ कृषी अधिकारी पालांदूर.
उष्णता, पाण्याअभावी पिके करपली
By admin | Updated: April 28, 2016 00:28 IST