छत्रपतीनगरमधील नागरिकांना आरोग्याचा धोका
माजलगाव : शहरातील प्रभाग एकमधील छत्रपतीनगर या भागात नगरपालिकेने नाली बांधकाम करून दुसऱ्या नालीला जोडणे आवश्यक होते. अर्धवट नाली करून सर्व पाणी या भागातील एका प्लॉटमध्ये सोडून देण्यात आल्याने या भागात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
माजलगाव शहरालगत असलेल्या बायपास रोडवर छत्रपतीनगर ही कॉलनी नवीन झाली होती. या भागात सुविधा नसल्याने नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेकडे पत्रव्यवहार करून, या भागात रस्ते व नाल्या करून न दिल्यास, या भागातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात होते. यानंतर नगरपालिकेने या भागातील नाल्या बांधकाम सुरू केले.
इतर भागातील पाणी बाहेर काढून देणे आवश्यक असताना अर्धवट नाली करण्यात आली आहे. ही अर्धवट नाली केल्यामुळे येणारे पाणी एका प्लॉटमध्ये सोडण्यात आले आहे.
प्लॉटमध्ये इतर ठिकाणचे पाणी येऊन जमा होत असल्याने आजुबाजूला राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होऊ लागला आहे. त्याचबरोबर या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
याबाबत या भागातील नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना भेटून याबाबत सांगितले.
महिन्यापूर्वी मुख्याधिकारी यांनी या ठिकाणी भेट दिली होती. परंतु त्यानंतर त्यांनी पुढे काहीच केले नाही. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात या भागातील नागरिक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. या भागातील नागरिकांना त्रास व्हावा, या उद्देशाने ही नाली जोडू नये, असे गुत्तेदाराला एका नगरसेवकाने सांगितल्याने ही नाली जोडण्यात आली नसल्याचे या भागातील नागरिक सांगत होते. या भागातील एकाने घराचे बांधकाम जास्त करून नाली देखील उंच बांधलेली असल्याने या ठिकाणावरून पाणी जात नाही. संबंधित बांधकामधारकास नोटीस देऊन त्यांची नाली पाडण्यात येईल. त्यानंतर ही नाली पुढे जोडण्यात येईल.
- शेख मंजूर, नगराध्यक्ष
050721\1359purusttam karva_img-20210705-wa0056_14.jpg