लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : कोरोनामुळे शहरातील फूल व्यवसाय डबघाईस आल्यामुळे फूल विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. फुलांची विक्री सद्य:स्थितीत ठप्प झाल्यामुळे कुटुंबाचा घरखर्च कसा भागवावा? अशी व्यथा फूल विक्रेत्यांनी मांडली.
कोरोना महामारी अगोदर फूल व्यवसाय चांगला चालायचा. दिवसाकाठी ५०० ते ६०० रुपये पदरात पडायचे. परंतु दीड वर्षापासून १०० रुपयांची पण फूल विक्री होत नाही. ग्राहक मागतील त्या भावात फूल विक्री करावी लागत आहे. कोरोनाआधी फुलांना चांगली मागणी होती.विवाह कार्य, देवस्थाने बंद असल्यामुळे फूल व्यवसाय डबघाईस आला आहे. वाहनांची व्यवस्था नसल्यामुळे परजिल्ह्यांतील फुले येईनाशी झाली आहेत. जिल्ह्यात व परिसरात जी उपलब्ध आहेत. तीच फुले विकत घेऊन घरसंसार भागवावा लागत आहे.
....
सद्य:स्थितीत जरबेरा ३० रुपये बंडल, गुलाब ६० रुपये किलो, गलांडा २० रुपये किलो, तर मोगरा १५० रुपये किलो भावाने विक्री होत आहे. शहरामध्ये फुलांची दुकाने जवळपास २० ते २५ आहेत. पिढ्यान्पिढ्या हाच व्यवसाय करीत असल्यामुळे दुसरा व्यवसाय आता करणे कठीण आहे. बाजारपेठेत महिन्याकाठी एक क्विंटलपर्यंत फुलांची विक्री होते. यातून जवळपास महिन्याकाठी ४० हजारांची उलाढाल होते, असे फूल विक्रेत्यांनी सांगितले.
....
फूल विक्रीसाठी वेळ वाढवावी
फूल विक्रेत्यांची अडचण लक्षात घेऊन शासनाने त्यांना जास्तीची वेळ द्यावी, म्हणजे फूल व्यवसाय करता येईल. फूलविक्रेत्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. कोरोना महामारीमुळे ग्राहकही दुकानांवर येईनासे झाले आहेत. कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा? असा प्रश्न आहे.
-विलास फुलारी, फूलविक्रेता, अंबाजोगाई