गेवराई : कृषी विभागाने खरीप हंगामाची पूर्वतयारी करताना शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी मोहिमा जाहीर केल्या आहेत. त्याप्रमाणे कृषी विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करत आहेत.
सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी करूनच पेरणी करावी. त्याची प्रात्यक्षिके प्रत्येक वैयक्तिक शेतकऱ्यांकडे जाऊन करून दाखवली. तसेच चांगली उगवण क्षमता असल्यास घरच्या घरीच असलेले सोयाबीनचे बियाणे पेरणीसाठी वापरावे, असे मार्गदर्शन करत बीजप्रक्रिया व रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने मंडळ कृषी अधिकारी अश्विनी म्हस्के व तालुका कृषी अधिकारी बी.टी. सोनवणे यांनी केले आहे.
२१ मे रोजी ठाकर आडगाव आणि बेलगुडवाडी येथील शेतकऱ्यांना बांधावर खत वाटप व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच जगदीश काळे, भागवत जाधव, ग्राम कृषी संजीवनी समितीचे सदस्य संदीप कोकाटे, यांच्या हस्ते शेतकऱ्यांना गटामार्फत बांधावर खत वाटप करण्यात आले.
दरम्यान बियाणाची पेरणी करण्यापूर्वी बुरशीनाशक आणि रायझोबियम किंवा ॲझोटोबॅक्टर पी एस बी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. जेणेकरून दहा टक्के रासायनिक खतांची बचत होईल. पावसाळ्यातील खरीप पिकांची पेरणी शक्यतो बीबीएफ यंत्राद्वारे करावी. तसेच गावोगावी लावलेले जमीन सुपीकता निर्देशांक यानुसारच रासायनिक खतांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सुधाकर कोकाटे, रणजित पवार, नंदकुमार पवार, ऋषिकेश पवार, सतीश पवार, बाबासाहेब पवार, संदीप पवार, विजय पांढरे, ज्ञानेश्वर पांढरे, बाबू कोकाटे यांच्यासह आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यात तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी जातेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप पूर्वतयारी अंतर्गत गाव पातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे.
===Photopath===
240521\3447img-20210524-wa0193_14.jpg