अंबेजोगाई शहर हे प्रस्तावित जिल्ह्याचे ठिकाण आहे. शहराची लोकसंख्या एक लाखांहून अधिक आहे. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी राहतात. शाळा-महाविद्यालयांच्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची समस्या उद्भवलेली आहे. त्याचप्रमाणे, भगवान बाबा चौक, बस स्थानक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजीव गांधी चौक, यशवंतराव चव्हाण चौक, पाण्याची टाकी, अण्णाभाऊ साठे चौक, मंडी बाजार, वैद्यकीय महाविद्यालय परिसर, प्रशांत नगर इत्यादी ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.
काही वर्षांपूर्वी वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरांमधील चौकाचौकात सिग्नल बसविण्यात आले होते, परंतु या सिग्नलचा वापरच अद्याप होत नसल्या कारणाने वाहतूक अत्यंत बेशिस्त झालेली आहे. वाहतुकीच्या समस्येबाबत शहरवासीयांनी त्याच प्रमाणे विद्यार्थी, व्यापारी यांनी पोलीस प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत, परंतु पोलीस प्रशासनाकडून केवळ आश्वासनाची खैरात वाटली जाते. नवीन पोलीस अधिकारी आल्यास अंबेजोगाईचे नागरिक वाहतुकीच्या समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यास भेटतात आणि त्यांना वाहतूक सुरळीत करावी, अशी आवर्जून विनंती करतात, परंतु या विनंतीचा व निवेदनांचा पोलीस गांभीर्याने विचार करत नाहीत.
शहरातील मंडी बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, प्रशांत नगर या ठिकाणी वन-वे वाहतुकीची आवश्यकता आहे. असे केल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे, शहरातील मुख्य रस्त्यांवर दुभाजके नाहीत. त्यामुळे आणखीनच समस्या निर्माण होते आहे.
त्याचप्रमाणे, मुख्य रस्त्यावरती, नगरपालिकासमोर सकाळी सात वाजल्यापासून भाड्याने चालणाऱ्या कार व जीप उभी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. खेडोपाडी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲाटोची संख्याही कमी नाही. त्याचप्रमाणे, भाजीपाला विक्रेते, हातगाडे यांचाही वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. वंजारी वस्ती वसतिगृह, पंचायत समिती, प्रशांतनगर पाण्याची टाकी या परिसरामध्ये उभ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
===Photopath===
070321\20201228_172842_14.jpg