नागरिकांमध्ये उत्सुकता : दुपारी १२ वाजेनंतर निकाल बाहेर अमरावती : सोळाव्या लोकसभेसाठी खासदारांचा मान कुणाला मिळणार? याविषयी जिल्ह्यात कमालीची उत्सुकता आहे. मतमोजणीची वेळ अवघ्या काही तासांवर आली आहे. यावेळी ‘रेकॉर्डब्रेक’ मतदान झाल्याने कौल कुणाला? हे शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यानंतर स्पष्ट होणार आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात १६ लाख ८ हजार ८८८ मतदार आहेत. यापैकी १0 लाख १ हजार १४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. ही टक्केवारी ६२.२३ एवढी आहे. अमरावती मतदारसंघातील आजवरचे हे सर्वाधिक मतदान आहे. मेळघाट, अचलपूर, दर्यापूर विधानसभा मतदारसंघात ६८ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. वाढलेल्या मतदारांचा कौल कुणाला? याविषयी चर्चा रंगत आहेत. अमरावती लोकसभेसाठी सेना-भाजप महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनीत राणा, बसपाचे गुणवंत देवपारे आणि रिपाइंचे राजेंद्र गवई यांच्यासह १९ उमेदवार आहेत. राकाँने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने यावरुन वाद उफाळला आणि हा मतदारसंघ चर्चिला गेला. एक्झीट पोल, सट्टा बाजारातील चढउतार यामुळे उत्सुकता वाढली आहे. जिल्ह्यातील मतदारांचा कौल हा दुपारी १२ वाजतानंतर स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघानिहाय फेरी मरावती लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये १८३४ मतदान केंद्र आहेत. एकाच वेळी २0 टेबलवर विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी होणार आहे. साधारणपणे १५ फेर्यानंतर निकाल घोषित होईल. अमरावती विधानसभा मतदारसंघात २४५ मतदान केंद्र असल्याने येथील मतमोजणी लवकर आटोपेल. मेळघाटमध्ये सर्वाधिक ३५५ मतदान केंद्र असल्याने वेळ लागणार आहे.
कौल कुणाला?
By admin | Updated: May 15, 2014 23:03 IST