इंदल चव्हाण अमरावतीअमरावती : शुक्रवारी गणेश चतुर्थी. बाप्पाला घरी नेण्यासाठी नागरिकांची लगबग चाललेली. गणेश विक्रीचे मुख्य आणि महत्त्वाचे मार्केट म्हणून पूर्वीपासूनच नेहरू मैदानाचा बोलबाला. यंदाही येथे गणेशाच्या मूर्तींची दुकाने थाटली गेली. भाविक सहकुटुंब विघ्नहर्त्याची मूर्ती खरेदी करण्यासाठी गेले. पण, मैदानात पाऊल ठेवताच चिखलाचे साम्राज्य दृष्टीस पडले. ठिकठिकाणी साचलेले डबके वाट अडवीत होते. या सगळ्यातून कसरत करून भाविकांनी कसेबसे बाप्पांना घरी आणले. या अव्यवस्थेमुळे भाविकांचा हीरमोड तर झालाच पण, मूर्ती विक्रेत्यांनाही फटका बसला.काहींनी चिखलामुळे रस्त्यावरील स्टॉलवरून मूर्ती खरेदी केली. त्यामुळे पैसे देऊन उभारलेल्या स्टॉलधारकांना किंमत कमी करावी लागली. त्याचा फटका बसल्याचे एका मूर्ती विक्रेत्याने 'लोकमत'शी बोलताना सांगितले.हे ठिकाणी म्हणजे शासकीय महसुलात भर पाडणारे महत्त्वाचे स्त्रोत समजले जाते. त्यामुळे स्टॉल असताना येथे कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहतूक पोलिसांसह बंदोबस्तासाठी शहर कोतवाली पोलिसांची नियुक्ती करण्यात आली. यावर्षी येथे एक पीएस आय, १० पोलीस कर्मचारी यामध्ये तीन महिला पोलीस व १० सैनिक (होमगार्ड) चा सहभाग होता. येथील मैदानात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने पाण्याचे डबके तसेच मातीचा अधिक भरणा असल्याने पावसामुळे सर्वत्र चिखल साचला आहे. मात्र मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करीत चिखल तुडवावे लागले. याची व्यवस्था संबंधित विभागाने करणे महत्त्वाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विघ्नहर्त्याच्याच मार्गात विघ्न!
By admin | Updated: August 30, 2014 01:05 IST