परतवाडा : काही दिवसांपासून लागत असलेल्या मेळघाटच्या जंगलातील आगींमुळे मेळघाटची जैवविविधता धोक्यात आली आहे. जंगलाला लागलेल्या आगीत केवळ पालापाचोळा, गवत जळाल्याच्या नोंदी घेणाऱ्या वनकर्मचारी, वनअधिकाऱ्यांचे येथील जैवविविधतेकडे दुर्लक्ष होत आहे.
जंगलाला आगी लागू नयेत, लागलीच तर नुकसान होऊ नये म्हणून दरवर्षी मेळघाट व वन्यजीव भागात दरवर्षीच फेब्रुवारीपर्यंत फायर लाईनची कामे मोठ्या प्रमाणावर केली जातात. यावर दरवर्षी कोट्यावधीचा खर्च केला जातो. फायर वॉचर, अंगारी, वनमजुरांवर या आगींच्या अनुषंगाने प्रत्येक वनपरिक्षेत्रात लाखो रुपये खर्ची घातले जातात. आगीच्या सिझनमध्ये वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे वास्तव्य त्यांच्या मुख्यालयी असणे अपेक्षित ठरते.
दरम्यान, लागलेल्या आणि लागत असलेल्या आगी बघता, यावर्षी ही फायर लाईनची कामेच कुचकामी ठरली आहेत. या फायर लाईनच्या कामांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मेळघाटात यावर्षी फायर लाईनची कामे सुरू असताना, ही जंगलाला मोठ्या प्रमाणात आगी लागल्या आहेत.
अंजनगाव वनपरिक्षेत्रात सर्वाधिक आगी लागल्या आहेत. पोपटखेड-पांढरा खडकपासून पार दहीगाव-अंबाबाटी, गिरगुटी, टेंब्रुसोंड्यापर्यंत जंगल जळाले आहे. अंजनगाव वनपरिक्षेत्रात चार रोपवने जळाली आहेत. या जळालेल्या रोपवनांत शंभर हेक्टर क्षेत्रातील हजारो, लाखो रोपे जळाली आहेत. या रोपवनांवर चौकीदार आहेत. रोपवनांना कंपाऊंड आहे. पाण्याकरिता बोअर (ट्यूबवेल) आहेत. लक्ष ठेवायला वनरक्षक, वनपाल आहेत. तरीही रोपवन जळाली आहेत. या जळालेल्या रोपवनांना मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या उपवनसंरक्षकांनी भेटी दिल्या. तेव्हा अनेक वनकर्मचारी, अधिकारी त्यांना मुख्यालयी आढळून आले नाहीत.
बॉक्स
आरएफओच नाहीत
संवेदनशील अशा अंजनगाव वनपरिक्षेत्राला नियमित आरएफओचे नाहीत. मागील सहा महिन्यांपासून अतिरिक्त प्रभारावर तेथे आरएफओ आहेत. हे आरएफओ परतवाडा वनपरिक्षेत्राचे आहेत. परतवाड्याचा नियमीत प्रभार त्यांच्याकडे आहे. आधी परतवाडा, मग वेळ मिळालाच तर अंजनगाव, यातही परतवाडा आरएफओ अमरावती प्रादेशिक वनविभागातील आहेत. त्यांच्याकडे मेळघाट प्रादेशिक वनविभागातील अंजनगाव वनपरिक्षेत्राचा अतिरिक्त भार दिला आहे. मूळ आस्थापना, मूळ विभागासह दुसऱ्या विभागातील अतिरिक्त प्रभार देण्याची आणि घेण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.