चिखली (जि. बुलडाणा), दि. १७: सापाला वाचविण्याच्या नादात दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती समोरुन येणार्या एस.टी. बसवर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी सांयकाळी चिखली - देऊळगावराजा मार्गावरील महाबीज परिसरात घडली. या दुर्देवी घटनेत मृत्यूमुखी पडलेले दोघे जण साले-मेव्हणे आहेत.विठ्ठल भगवान जाधव (वय २२ वष्रे रा.रासतळ ता.जाफ्राबाद) व राजु गणेश शिंदे (वय ३0 रा.देऊळगावराजा) हे दोघे दुचाकीने (क्रमांक एम. एच. २१ एके २२५२) चिखलीहून देऊळगावराजाकडे जात होते. यावेळी महाबीज परिसरात दुचाकीसमोर अचानक आलेल्या सापाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व विरूध्द दिशेने येणार्या औरंगाबाद-खामगाव (क्रमांक एम.एच.४0 - ९0९८) या बसवर समोरासमोर धडकले. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर बस चालक स्वत:हून बससह पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.
सापाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांनी गमावला जीव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2016 02:14 IST