बाश्रीटाकळी - अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. सुरक्षेविषयी अधिकारी व प्रशासन गंभीर नसल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला आहे. जलसाठय़ात वाढ होत आहे. धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले अधिकारी व कर्मचारी येथे चोवीस तास तैनात असणे गरजेचे असताना केवळ बोटावर मोजण्या इतक्या कर्मचार्याच्या भरवशावर हे धरण आहे. धरणावरील वीज पुरवठा नेहमी खंडित असल्याने कर्मचार्यांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे. धरणावर आपत्कालीन परिस्थितीसाठी जनरेटरची व्यवस्था आहे; परंतु डिझेलचा तुटवडा असल्याने जनरेटर असूनही काही उपयोग होत नाही. धरणावरील दूरध्वनी अनेक दिवसांपासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे. धरणामध्ये पाणी जास्त झाल्यास ते सोडण्याकरिता वीज असणे गरजेचे आहे. जनरेटर असेल तर डिझेलचा तुटवडा न भासू देणे हे येथील अधिकार्यांचे काम आहे; परंतु अधिकारी गंभीर नसल्याने केवळ डिझेलच्या कारणाने जनरेटर बंद असते. तसेच धरण परिसरात मोठय़ा प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. साफसफाई नसल्याने हा परिसर अस्वच्छ झाला आहे. धरणावर आवश्यक साधनसामग्री नसल्याने येथील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धरण परिसरात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने धरणावर लक्ष ठेवणे कठीण झाले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास अख्या परिसर अंधारात असते. ही बाब अकोलेकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. याबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलावी, अशी मागणी होत आहे.
महान धरणाची सुरक्षा धोक्यात
By admin | Updated: August 4, 2014 20:25 IST