अहमदनगर : आषाढी एकादशी व रमजान ईद या सण-उत्सवांच्या काळात महावितरणने भारनियमन रद्द केले आहे. २९ जून ते ३० जुलै या काळात त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे महिनाभर तरी ग्राहकांची भारनियमनातून सुटका होईल. सण-उत्सवांच्या काळात महावितरण भारनियमन रद्द करत असते. सध्या आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून पंढरपूरकडे दिंड्यांचा ओघ सुरू असून, ९ जुलै रोजी पंढरपूर यात्रा आहे. तसेच रमजाननिमित्त मुस्लीम बांधवांचे उपवास सुरू होत आहेत. त्यामुळे भाविकांच्या उत्सवावर विरजण नको म्हणून महावितरणने जिल्हाभरातील भारनियमन २९ जून ते ३० जुलै या काळात रद्द केले आहे. परिणामी ग्राहकांना महिनाभर भारनियमनातून दिलासा मिळणार आहे. नगर शहरातील गंजबाजार, झेंडीगेट, फकिरवाडा, मुकुंदनगर, कापड बाजार, तसेच भिंगार, बुऱ्हाणनगर, केडगाव, बोल्हेगाव आदी भागांत सध्या भारनियमन होत आहे. येथील ग्राहकांना या निर्णयामुळे महिनाभर दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागात सिंगल फेज असलेल्या गावांतही सुरळीत वीजपुरवठा असेल. (प्रतिनिधी)
महिनाभर भारनियमन बंद
By admin | Updated: June 29, 2014 00:29 IST