अहमदनगर : कल्याण रोड परिसरात या आठवड्यामध्ये पाच ते सहा ठिकाणी घरे, दुकानांमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत. अनेकांच्या दुचाकीही चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. तसेच अनेकांनी त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिले असता रोजच चोरटे हातामध्ये लाठ्या-काठ्या घेऊन वावरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी कोतवाली पोलिसांकडे केली आहे.
या परिसरातील व्यावसायिक ॲड. युवराज शिंदे, धनंजय सातपुते यांनी शुक्रवारी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांना निवेदन दिले. यावेळी अजय वाडेकर, वैष्णव मुडलीक, रवी मैड, रोहित काळोखे, विजय बुगे, सचिन भागवत, नासिर मणियार, विवेक विधाते, गणेश सुंबे, चंदन बारसे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कल्याण रोड परिसरामध्ये अनुसयानगर आनंदपार्क, विद्या कॉलनी, समतानगर, आदर्श नगर परिसरात २६ ऑगस्टपासून दररोज मध्यरात्री चोरटे हत्यारे घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहेत. राजरोसपणे घराच्या दारे-खिडक्या तोडून घरात घुसत आहेत. तसेच हत्याराचा धाक दाखवून चोऱ्या करत आहेत. या सर्व घटनेने कल्याण रोडवरील नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागामध्ये पोलिसांकडून गस्त घातली जात नाही. त्यामुळे चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. पोलिसांनी या भागात गस्त घालावी व नागरिकांना सुरक्षा द्यावी. तसेच या भागातील दुचाकीचोरीमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
-----------
फोटो- ०४ कल्याण रोड
कल्याण रोड परिसरातील नागरिकांनी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांना निवेदन दिले. समवेत युवराज शिंदे, धनंजय सातपुते आदी.